रत्नागिरीत लवकरच विमानतळ सुरू होणार, उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती
रत्नागिरीतील विमानतळाचा आढावा घेत असून, आताही घेतलाय. टर्मिनल बिल्डिंगदेखील तयार होतेय. लवकरच रत्नागिरी विमानतळ सुरू होईल, असे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत म्हणालेत.


Published : February 21, 2026 at 11:55 AM IST
|Updated : February 21, 2026 at 1:55 PM IST
रत्नागिरी : भविष्यात नगरपरिषदेच्या कामकाजात वाढ होईल, या दृष्टीने आपण काम करत असल्याचे सांगून रत्नागिरीतील विमानतळाचा आढावा आपण वेळोवेळी घेत असून, आताही घेतला आहे. टर्मिनल बिल्डिंगदेखील तयार होत आहे. लवकरच रत्नागिरी विमानतळ सुरू होईल, असे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मे महिन्यामध्ये इमारतीचा लोकार्पण सोहळा होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मैत्री टिकवणे आणि राजकारण हे दोन्ही वेगळे भाग : दरम्यान, मनसे आणि ठाकरे सेना यांच्या युतीबाबत त्यांनी यावेळी भाष्य केले. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली त्याच वेळेला मी बोललो होतो की, राज ठाकरेंचा विश्वासघात होईल, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला जाईल, त्याचे हे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. मैत्री टिकवणे आणि राजकारण हे दोन्ही वेगळे भाग आहेत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध मैत्रीपूर्ण असल्याने त्यांच्या भेटीवरती जळफळाट करण्याचे कारण नाही, असे नमूद करतानाच मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे झालेत, असे ते म्हणाले.
शक्तीपीठ महामार्ग हा राज्यासाठी गेमचेंजर : मैत्री टिकवायची असेल तर काही लोकांना पोटशूळ उठतो, काही लोकांचा जळफळाट होतो, हेच राज ठाकरेंनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितले असल्याची आठवण उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी करून दिली. पुढे बोलताना त्यांनी शक्तीपीठ महामार्ग हा राज्यासाठी गेमचेंजर असल्याचे नमूद केले. आपली सर्व शक्तिपीठं या रस्त्यावरती आहेत म्हणून त्याला शक्तीपीठ महामार्ग नाव दिलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यामध्ये स्वतः लक्ष घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच समृद्धी महामार्गप्रमाणेच शक्तिपीठ महामार्ग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना भरपाई देणार : दरम्यान, रत्नागिरीतील आंबा बागायतदारांची बैठक घेतली असून, या बैठकीत बागायतदारांचे म्हणणे समजून घेतले आहे. ज्या आंबा बागांमध्ये नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी मी अधिकाऱ्यांसोबत जाऊन बैठक घेणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री सामंत यांनी बागायतदारांना दिलासा दिला आहे.
हेही वाचाः
राहुल गांधी यांची केवळ काही मिनिटंच न्यायालयात हजेरी, भाजपानं दाखवले काळे झेंडे
शिर्डीत आंध्रप्रदेशातील पाकिटमारी टोळी अटकेत, सतर्क राहण्याचं प्रशासनाचं भाविकांना आवाहन

