ETV Bharat / state

अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसच्या 'त्या' 12 नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं अंबरनाथमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या युतीत दुरावा निर्माण झाला आहे.

Ambernath Municipal Council
अंबरनाथ नगरपरिषद (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 8, 2026 at 6:05 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपानं नगराध्यक्षपद पटकावलं. मात्र, नगरसेवक निवडीमध्ये शिवसेनेनं बाजी मारत 27 नगरसेवक निवडून आणले. तर भाजपाचे 14 नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे सभागृहात कुठल्याही ठराव मतदानासाठी 30 हून अधिक संख्याबळ लागते. याच संख्या बळासाठी सत्ता समीकरण भाजपाच्या बाजूनं राहावं, यासाठी शिवसेनेलासोबत न घेता भाजपानं फोडाफोडीचं राजकरण करत काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतलं आहे. काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं अंबरनाथमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या युतीत दुरावा निर्माण झाला आहे.

काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश : काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आपल्यासोबत 12 नगरसेवकांचा वेगळा गट तयार केला. त्यामुळं त्यांच्यासह 12 काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं असलं तरी त्यांनी आपला गट भाजपासोबत विलीन करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार आज काँग्रेसचं निलंबित 12 नगरसेवक भाजपामध्ये विलीन झाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, दीपेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या या निलंबित नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी या सर्व नगरसेवकांचं पक्षात स्वागत केलं.

प्रभागातील कामं जलद गतीनं होतील : दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदीप पाटील म्हणाले की, "आम्ही निवडून आल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीनं आमचा सन्माननीय केला नाही, आम्हाला बोललंही नाही. साधी विचारपूसही केली नाही, ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ हा भाजपा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात आम्ही 12 लोकं काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो. आमच्या निवडीचं कारण आम्ही आमच्या प्रभागात केलेली कामं या कामाच्या जोरावर आम्ही निवडून आलो. मात्र आम्हाला विश्वासात न घेता काँग्रेसमधून अचानक आमचं निलंबन करण्यात आलं. यामुळं पुढील निर्णय आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपासोबत गेल्यानं प्रभागातील कामं जलद गतीनं होतील. यामुळ आज आम्ही काँग्रेसचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश केला आहे."

शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार : अंबरनाथच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे होते. मागील तीस वर्षांत प्रथमच इथं शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला व भाजपाच्या तेजश्री करंजुले पाटील या काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. गटनेतेपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपानं काँग्रेसला सोबत घेत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपानं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष असे एकूण 59 नगरसेवकांपैकी 31 नगरसेवक आपल्या गटात सामील केले. त्यामुळं सर्वात जास्त नगरसेवक निवडून येऊन देखील शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.


हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल
  2. शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएसोबत जाणार नाहीत, संजय राऊतांची रोखठोक भूमिका
  3. तर्रीपोहा विथ देवाभाऊ;नागपूरच्या विकासावर रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष संवाद सोहळा; शहरात 50 ठिकाणी थेट प्रक्षेपण


हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल
  2. शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएसोबत जाणार नाहीत, संजय राऊतांची रोखठोक भूमिका
  3. तर्रीपोहा विथ देवाभाऊ;नागपूरच्या विकासावर रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष संवाद सोहळा; शहरात 50 ठिकाणी थेट प्रक्षेपण