80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र, जयंत पाटील म्हणाले, 'योजना हळूहळू बंद...'
सुमारे 80 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत.

Published : June 1, 2026 at 1:17 PM IST
|Updated : June 1, 2026 at 2:17 PM IST
मुंबई - ई-केवायसीची अंतिम मुदत संपल्याने सुमारे 80 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. महायुती सरकार गंभीर आर्थिक संकटामुळे लाभार्थ्यांना योजनेतून वगळत असल्याचा तीव्र आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
80 लाख महिला अपात्र - एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी 'पीटीआय'ला सांगितले की, 30 एप्रिलच्या ई-केवायसी मुदतीनंतर लाभार्थ्यांची संख्या 2.4 कोटींवरून जवळपास 1.7 कोटींपर्यंत घटली आहे, परंतु ही अपात्रता पात्रतेच्या निकषांचे पालन न करण्याशी देखील संबंधित होती. सरकारने लाभार्थ्यांना त्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत दिली होती, असे ते म्हणाले.
...म्हणून महिला अपात्र - "या कालावधीत सुमारे 50 ते 55 लाख महिला ही प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, तर दोन ते तीन लाख महिलांनी चुका दुरुस्त केल्या. याव्यतिरिक्त, जवळपास 12 लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांची मर्यादा ओलांडून त्या आयकर भरणाऱ्या असल्याचे आढळून आले, आणि साडेचार लाखांहून अधिक महिलांनी 65 वर्षांची कमाल वयोमर्यादा ओलांडली होती," असे अधिकाऱ्याने सांगितले.
विरोधकांचा हल्लाबोल - दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) नेते जयंत पाटील यांनी दावा केला आहे की, या योजनेतून लाभार्थ्यांना वगळणे हे राज्यासमोर असलेल्या गंभीर आर्थिक संकटाचे द्योतक आहे. पाटील यांनी आरोप केला की, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणारी ही योजना, लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या खराब कामगिरीनंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली होती.
"लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहीण योजनेच्या तब्बल 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे," अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
हेही वाचा -

