निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा एकहाती विजय; सेमीफायनलपासून एक पाऊल दूर
टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत आज भारतीय क्रिकेट संघाचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळवण्यात आला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला.

Published : February 26, 2026 at 10:33 PM IST
चेन्नई IND Beat ZIM : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत आज भारतीय क्रिकेट संघाचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळवण्यात आला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियानं 72 धावांनी एकहाती विजय मिळवला. यासह झिम्बाब्वेचं या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं असून टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीत कायम आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे संघानं 2002 नंतर पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतीय भूमीवर सामना खेळला. यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सामन्यात टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 256 धावांचा हिमालय उभारला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघ 20 षटकांत 6 बाद 184 धावांपर्यंत मर्यादित राहिला. या पराभवासह, झिम्बाब्वे आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर टीम इंडियाला आता सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकावा लागेल, जो 1 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल.
India stay in the hunt for a #T20WorldCup semis spot with a splendid win over Zimbabwe ✨
— ICC (@ICC) February 26, 2026
📝: https://t.co/XB78VZ8s3p pic.twitter.com/hGL1LzLvmz
टीम इंडियाची प्रथम फलंदाजी : करो या मरो परिस्थितीच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. संजू सॅमसन 24 धावांवर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मानं इशान किशन (38) सह भारताची धावसंख्या वाढवली. किशन बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार सूर्यानंही अभिषेकला चांगली साथ दिली. मात्र 13व्या षटकात फटका मारण्याच्या नादात अभिषेक 55 धावांवर बाद झाला, त्यानं आपल्या खेळीत 4 चौकार आणि तेवढेच षटकार मारले. शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार सूर्या (33), हार्दिक पांड्या (50*) आणि तिलक वर्मा (44) यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळं भारतानं निर्धारित 20 षटकांत 4 बाद 256 धावांचा डोंगर उभारला.
A comprehensive victory 🙌#TeamIndia clinch the #INDvZIM clash by 7️⃣2️⃣ runs courtesy of an all-round effort!
— BCCI (@BCCI) February 26, 2026
Scorecard ▶️ https://t.co/p4GxtxGkBf#T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/Sk1dlTQ4FD
भारताची दमदार गोलंदाजी : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांकडून अर्शदीप सिंगची प्रतिभा दाखवली. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेट आणि मारुमानी या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अक्षर पटेलनं डावाच्या सातव्या षटकात मारुमानीला 20 धावांवर बाद करून मोडली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या डायन मेयर्सला फलंदाजीनं लक्षणीय प्रभाव पाडता आला नाही आणि त्यानं फक्त 6 धावा केल्या. त्यानंतर ब्रायन बेनेट आणि सिकंदर रझा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या, परंतु तोपर्यंत त्यांचा पराभव जवळजवळ निश्चित झाला होता. या सामन्यात सिकंदर रझानं 31 धावा केल्या, तर ब्रायन बेनेट नाबाद राहिला आणि त्यानं 97 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगनं या सामन्यात सर्वाधिक तीन बळी घेतले, तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
टी-20 विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या : टीम इंडियानं टी-20 विश्वचषक इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. 2007 मध्ये केनियाविरुद्ध 260 धावा करुन श्रीलंकेनं सर्वाधिक धावसंख्या नोंदवली होती. हा विक्रम अखंड आहे. मात्र, आता टी-20 विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारतानं 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध 218 धावा केल्या होत्या.
हेही वाचा :

