ETV Bharat / sports

सिंगापूर ओपन जिंकल्यानंतर धक्का; सात्विकला दुखापत झाल्यानं भारतीय जोडीची इंडोनेशिया ओपनमधून माघार

भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, यांचा इंडोनेशिया ओपन 2026 मधील प्रवास निराशाजनक रीतीनं संपला.

satwiksairaj rankireddy
सिंगापूर ओपन जिंकल्यानंतर धक्का (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : June 3, 2026 at 5:02 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Satwik-Chirag Pull Out : भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, यांचा इंडोनेशिया ओपन 2026 मधील प्रवास निराशाजनक रीतीनं संपला. दुखापतीमुळं या भारतीय जोडीला जकार्ता येथील सुपर 1000 स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली. मलेशियाच्या कांग खाई शिंग आणि ॲरॉन ताई यांच्याविरुद्ध खेळताना, ही भारतीय जोडी 6-11 नं मागे असताना सात्विकनं त्याच्या उजव्या खांद्यात वेदना होत असल्याची तक्रार केली आणि सामना थांबवण्यात आला. या हंगामात जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीला दुखापतीमुळं सामन्यातून माघार घ्यावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बीएआयचं निवेदन काय : भारतीय बॅडमिंटन संघटनेनं (BAI) सात्विकच्या दुखापतीची पुष्टी केली आहे. संघटनेनं म्हटलं आहे की, "सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सात्विकच्या दुखापतीमुळं पॉलीट्रॉन इंडोनेशिया ओपन 2026 मधून माघार घेतली आहे. ही जोडी आता आगामी महत्त्वाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी दुखापतीतून सावरण्यावर आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करेल." आम्ही सात्विक लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा देतो आणि ते दोघेही लवकरच कोर्टवर परतलेले दिसतील अशी आशा करतो.

सिंगापूर ओपन जिंकल्यानंतर दोन दिवसांत बसला धक्का : सात्विक आणि चिराग उत्कृष्ट फॉर्ममध्ये इंडोनेशिया ओपनमध्ये दाखल झाले होते. रविवारी सिंगापूर ओपन जिंकून त्यांनी जवळपास दोन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात, या भारतीय जोडीनं एक तास आणि 13 मिनिटं चाललेल्या चुरशीच्या सामन्यात फजर अल्फियान आणि मोहम्मद सोहिबुल फिक्री यांचा पराभव केला. एका आठवड्यापूर्वी, ते थायलंड ओपनच्या अंतिम फेरीतही पोहोचले होते.

दुखापतीबद्दल आधीच दिला होता इशारा : सिंगापूर ओपन जिंकल्यानंतर, सात्विकनं खेळाडूंसाठी फिटनेस आणि शारीरिक देखभालीच्या महत्त्वावर भर दिला होता. तो म्हणाला, "दुखापती फक्त मलाच होत नाहीत; कोणत्याही खेळाडूची कारकीर्द परिपूर्ण नसते. मला जाणवलं आहे की तुम्ही तुमच्या शरीराचा आदर केला पाहिजे." तो पुढं म्हणाला, "माझी खेळण्याची शैली बरीच आक्रमक आहे, त्यामुळं कधीकधी मी मोठ्या स्पर्धांना मुकू शकतो. तुम्हाला ते विसरुन पुढं जायला हवं, मोठ्या स्पर्धांसाठी स्वतःला तयार करायला हवं आणि तुमच्या शरीराची योग्य काळजी घ्यायला हवी." सात्विक पुढं म्हणाला, "ऑलिम्पिकपासून मी माझ्या शरीराची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे." "काही किरकोळ अडचणी येतच राहतात, पण तो खेळाचाच एक भाग आहे."

भारतासाठी संमिश्र दिवस : सात्विक आणि चिराग यांच्या दुखापतींमुळं भारतीय संघ निराश झाला असला तरी, रोहन कपूर आणि शिवानी रुथविका गड्डे यांनी मिश्र दुहेरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत, चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत 20व्या क्रमांकावर असलेल्या यांग पो-ह्सुआन आणि हू लिंग फांग या जोडीला 21-14, 21-14 असं पराभूत करुन दुसरी फेरी गाठली. महिला एकेरीमध्ये, पीव्ही सिंधू ही दुसरी फेरी गाठणारी एकमेव भारतीय एकेरी खेळाडू ठरली. दुसरीकडे, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. आता, ऑगस्टमध्ये नवी दिल्लीत होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यांसारख्या मोठ्या स्पर्धा नियोजित असल्यानं, भारतीय बॅडमिंटन चाहते सात्विकच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून असतील.

हेही वाचा :

  1. हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; न्यूझीलंडच्या खेळाडूचा विक्रम मोडला
  2. सामन्याच्या 2 दोन दिवसांपूर्वीच प्लेइंग 12 जाहीर; संघात दोन नव्या खेळाडूंचा समावेश
  3. French Open: जोडरवर विजय मिळवत झ्वेरेव्ह उपांत्य फेरीत; सहा वर्षांत पाचव्यांदा अंतिम चारमध्ये