
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला विश्वचषक विजेत्या संघाबरोबर साधला संवाद, 'फिट इंडिया' मोहिमेचं केलं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भारतीय महिला विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली.

Published : November 5, 2025 at 9:25 PM IST
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भारतीय महिला विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली. पंतप्रधानांनी खेळाडूंना त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले आणि स्पर्धेत सलग तीन पराभवांनंतर संघाच्या उल्लेखनीय पुनरागमनाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच टीम इंडियाच्या विजयाबद्दल सोशल मीडियावरुन अभिनंदन आणि कौतुक केलं होतं. मैदानावर भारतीय संघाच्या पोरींनी दाखवलेल्या धाडसी आणि शानदार खेळीचं बुधवारी पुन्हा एकदा कौतुक केलं.
आठवणींना दिला उजाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "संघाने केवळ मैदानावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हृदयात स्थान मिळवले आहे." कर्णधार हरमनप्रीत कौरने २०१७ मध्ये पंतप्रधानांना भेटल्याची आठवण सांगितली, परंतु त्यावेळी ट्रॉफी नसल्याचं ती म्हणाली. "आता आमच्याकडे ट्रॉफी देखील आली आहे. आम्हाला पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल," हरमनप्रीत हसत म्हणाली.
PHOTO | Prime Minister Narendra Modi (@narendramodi) today hosted the champions of Women’s World Cup at his residence at Lok Kalyan Marg today.
— Press Trust of India (@PTI_News) November 5, 2025
PM congratulated the team for the victory and praised their remarkable comeback in the tournament after a string of three defeats and… pic.twitter.com/yZido2VEpq
पंतप्रधान मोदींचे योगदान महत्त्वाचे : स्मृती मानधना म्हणाली, पंतप्रधानांनी नेहमीच आम्हाला प्रेरणा दिली आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि यामध्ये पंतप्रधान मोदींचे योगदान महत्त्वाचे आहे." दीप्ती शर्मा म्हणाली की, मी बऱ्याच काळापासून पंतप्रधान मोदींना भेटण्याची वाट पाहत होती. २०१७ मध्ये पंतप्रधानांनी आम्हाला कठोर परिश्रम करत राहण्यास सांगितलं होतं. आज ते स्वप्न वास्तवात उतरले आहे."
तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे : या विशेष बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंना, विशेषतः देशभरातील मुलींमध्ये, 'फिट इंडिया' चळवळीला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलंय. त्यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, "यशस्वी होण्याइतकेच तंदुरुस्त राहणे देखील महत्त्वाचे आहे."
हेही वाचा -

