ETV Bharat / sports

ICC चा बांगलादेशला 440 व्होल्टचा झटका; BCB ची मागणी फेटाळली

पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेश भारतात खेळण्याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. अलिकडेच, आयसीसी आणि बीसीबी यांच्यात या विषयावर चर्चा करण्यासाठी एक ऑनलाइन बैठक झाली.

T20 World Cup 2026
बांगलादेश (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 7, 2026 at 9:57 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई T20 World Cup 2026 : अलिकडेच, बीसीसीआयनं आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला सोडण्याचे आदेश दिले होते. बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भारतात बांगलादेशविरुद्ध वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी सांगितलं की त्यांना संघ भारतात पाठवणं सुरक्षित वाटत नाही आणि म्हणूनच त्यांनी आयसीसीला बांगलादेशचे सर्व टी-20 विश्वचषक सामने भारताबाहेर हलविण्याची विनंती केली.

आयसीसी आणि बीसीबी अधिकाऱ्यांमध्ये ऑनलाइन बैठक : आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये 6 जानेवारी रोजी, या मुद्द्याबाबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत आयसीसी आणि बीसीबीमध्ये झालेल्या चर्चेनंतर, आगामी पुरुषांच्या टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या भारत दौऱ्याबाबत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली. जर बांगलादेशला टी-20 विश्वचषकात खेळायचे असेल तर त्यांना त्यांचे सामने भारतात खेळावे लागतील. आयसीसी त्यांचे सामने इतर ठिकाणी हलवणार नाही.

आयसीसीनं बीसीबीला दिले कडक निर्देश : वृत्तसंस्था एनआयनं ईएसपीएनक्रिकइन्फोच्या हवाल्यानं दिलेल्या अहवालानुसार, 6 जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत, आयसीसीनं बीसीबीला सांगितलं की, सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशनं त्यांचे सामने भारताबाहेर खेळवण्याची विनंती नाकारली जात आहे. असं मानलं जातं की आयसीसीनं बीसीबीला सांगितलं की बांगलादेशने टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जावं, अन्यथा त्यांना गुण गमावावे लागू शकतात. मात्र, बीसीबीनं असा दावा केला आहे की त्यांना आयसीसीकडून असा कोणताही अल्टिमेटम मिळाला नाही.

बीसीबीची आयसीसीला सामने हलविण्याची विनंती : बीसीबीआय किंवा बीसीबीनं 6 जानेवारीच्या बैठकीबाबत अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. बीसीबीनं 4 जानेवारी रोजी आयसीसीला पत्र लिहून बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेर हलविण्याचा विचार करण्याची विनंती केली. त्यानंतर, आयसीसीनं बीसीबीसोबत ऑनलाइन बैठक घेण्याचा निर्णय घेतला. बोर्डानं विनंती केली होती की बांगलादेशी खेळाडू, संघ अधिकारी, बोर्ड सदस्य आणि इतर भागधारकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित केलं जावं आणि संघ सुरक्षित आणि अनुकूल वातावरणात सहभागी होईल. आम्हाला असं ठिकाण उपलब्ध करुन दिलं पाहिजे.

बांगलादेश ईडन गार्डन्सवर तीन सामने खेळणार : बांगलादेश 2026 च्या टी-20 विश्वचषकात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर तीन सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी त्यांना गट क मध्ये स्थान देण्यात आलं आहे. बांगलादेश 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज, 9 फेब्रुवारी रोजी इटली आणि 14 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध ईडन गार्डन्सवर त्यांचे सामने खेळेल. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बांगलादेशचा सामना नेपाळशी होईल. सामन्यांचं वेळापत्रक बदल करणं देखील आयसीसीसाठी कठीण आहे कारण सामन्यांची तिकिटं ऑनलाइन विकली जात आहेत.

हेही वाचा :

  1. T-20 वर्ल्ड कपसाठी 'ब्लॅक कॅप्स'ची घोषणा; पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूंना संघात जागा
  2. VHT मध्ये अचानक बदलला संघाचा कर्णधार; श्रेयस अय्यरला मिळाली संघाची कमान
  3. AUS vs ENG: जो रुटच्या शतकानंतर ट्रॅव्हिस हेडचा पलटवार; ऑस्ट्रेलियाचं सिडनी कसोटीत पुनरागमन