'आंतरराष्ट्रीय ग्रँड टूर सायकल स्पर्धा ठरणार विकासाचा मैलाचा दगड'; पुण्यात होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
येत्या 21ते 23 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत पार पडणार आहे. यासाठी झालेल्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

Published : January 9, 2026 at 7:10 PM IST
बारामती Pune Grand Tour : येत्या 21ते 23 जानेवारी दरम्यान होणारी आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून, संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे. ही शर्यत किमान 40 देशांमध्ये थेट प्रक्षेपित होणार असल्यानं सासवड आणि परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या स्पर्धेमुळं पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असं पुण्याचे जिल्हाधिकरी जितेंद्र डूड्डी यांनी म्हटलं आहे.
जिल्हाधिकऱ्यांनी केली पाहणी : जिल्हाधिकरी जितेंद्र डूड्डी यांनी आज शुक्रवारी बारामती आणि पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या सायकल स्पर्धेच्या मार्गाची पाहणी केली. त्याचबरोबर ज्या ज्या गावातून ही सायकल स्पर्धा जाते, त्या त्या गावातील स्थानिक लोकांशी त्यांनी संवाद साधला व सायकल स्पर्धेला प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं. पुरंदर तालुक्यातील नीरा इथं ग्रामस्थ व प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या स्पर्धेची माहिती लोकांना दिली. यावेळीउपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, मंडलाधिकारी बापुसाहेब देवकर, नीरेचे ग्राममहसूल अधिकारी मयुर पाटोळे, पिंपरे (खुर्द) चे ग्राममहसूल अधिकारी पल्लवी नरळे, पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, पिंपरें खुर्दचे सरपंच राजेंद्र थोपटे, ग्रामपंचायत अधिकारी रमेश राऊत यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले जिल्हाधिकारी : यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या तयारीची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले की, "पुणे जिल्ह्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीच्या तयारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्यात आली असून, या कामामुळं नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे एका दिवसापुरती मर्यादित न राहता, कायमस्वरुपी पायाभूत सुविधा निर्माण करणारी ठरणार आहे. या आंतरराष्ट्रीय आयोजनामागे आणखी एक मोठं स्वप्न आहे ते म्हणजे देशाच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणं. भविष्यात भारतासाठी ऑलिम्पिक पदकं मिळवून देणाऱ्या खेळाडूंची पायाभरणी याच भूमीतून व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पोलीस प्रशासन, पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि स्थानिक नागरिकांच्या सामूहिक सहभागातून ही शर्यत यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं पुणे जिल्ह्यातील मधील ही आंतरराष्ट्रीय शर्यत क्रीडा, विकास आणि राष्ट्रीय अभिमान यांचा संगम ठरणार आहे," असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला.

कशा असणार स्पर्धा : पुणे जिल्ह्यात होणारी ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ही महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद मानली जात आहे. ही स्पर्धा 21, 22 व 23 जानेवारी रोजी होणार असून आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ (UCI) मान्यताप्राप्त आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील नामांकित सायकलपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा मार्ग पुणे जिल्ह्यातील विविध भौगोलिक भागातून जाणार आहे. 21, 22आणि 23 जानेवारी रोजी ही तीन टप्प्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. पुणे शहरासाह पुरंदर, भोर, हवेली आणि बारामती तालुक्यातून या स्पर्धेचा मार्ग असणार आहे. पहिल्या दिवशी पुण्यातून ही स्पर्धा सुरु होणार असून तिसऱ्या दिवशी तिसऱ्या टप्प्यात बारामतीमध्ये या स्पर्धेची सांगाता होणार आहे. सपाट रस्ते, घाटमार्ग, ग्रामीण आणि डोंगराळ भाग असा मिश्र मार्ग असल्यानं सायकलपटूंच्या कौशल्याची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा केवळ क्रीडात्मक नसून पर्यटन, स्थानिक संस्कृती, ग्रामीण भागाचा विकास आणि जागतिक पातळीवर पुणे जिल्ह्याची ओळख निर्माण करणारी ठरणार आहे. या निमित्तानं हजारो खेळाडू, प्रशिक्षक व पर्यटक पुणे जिल्ह्यात दाखल होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
हेही वाचा :
- Explainer: आईस स्कीइंग म्हणजे काय, तो का आहे धोकादायक? ज्यामुळं 'वेदांता'च्या मालकाच्या एकुलत्या एक मुलाचा झाला मृत्यू
- चक्क विजेच्या कडकडाटामुळं सामना करावा लागला रद्द; दक्षिण आफ्रिकेतील टी-20 लीगमध्ये अजब घटना
- LIVE सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं माजी रणजी क्रिकेटपटूचा मृत्यू; 38व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

