ETV Bharat / sports

'आम्ही भारतात टी-20 विश्वचषक खेळू शकत नाही'; राष्ट्रीय प्रतिष्ठेचा दाखला देत बांगलादेशची आडमुठी भूमिका

टी-20 विश्वचषकाबाबत बांगलादेशची वक्तव्यं सतत सुरुच आहेत. आता, बांगलादेशच्या क्रीडा सल्लागारानं म्हटलं आहे की ते भारतात विश्वचषक खेळण्यास तयार नाहीत.

Bangladesh T-20 World Cup
बांगलादेश (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 8, 2026 at 11:39 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ढाका Bangladesh T-20 World Cup : पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेवरुन भारत आणि बांगलादेशमधील वाढता वाद अधिक गंभीर झाला आहे. बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बांगलादेश राष्ट्रीय अपमान, खेळाडूंची सुरक्षितता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या किंमतीवर विश्वचषक खेळण्यास तयार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नजरुल म्हणाले की, बांगलादेशच्या चिंता आतापर्यंत गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पटवून देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील.

भारतात खेळण्यावरुन सुरक्षेबाबत प्रश्न : बीसीसीआयनं कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला सोडण्यास सांगितल्यानंतर अलीकडेच वाद निर्माण झाला. त्यानंतर, बीसीबीनं आयसीसीला बांगलादेशच्या टी-20 विश्वचषक सामन्यांचं वेळापत्रक बदलण्याची औपचारिक विनंती केली. मात्र, बीसीबीला दिलेल्या उत्तरात आयसीसीनं म्हटलं आहे की त्यांना स्पर्धेदरम्यान बांगलादेशसाठी कोणत्याही सुरक्षेच्या चिंतांबद्दल माहिती नाही आणि यावेळी वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही. नजरुल यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.

राष्ट्रीय अपमानाचा मुद्दा : नझरुल म्हणाले की त्यांनी सर्व बीसीबी संचालकांशी भेट घेतली आणि परिस्थितीवर चर्चा केली. बांगलादेशनं कठोर परिश्रम करुन विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे आणि आम्हाला नक्कीच खेळायचं आहे. पण राष्ट्रीय अपमानाच्या किंमतीवर नाही, खेळाडू, प्रेक्षक आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेशी तडजोड करुन नाही. त्यांनी पुढं म्हटलं की जेव्हा भारतीय बोर्ड स्वतः असं म्हणत आहे की ते बांगलादेशी खेळाडूला सुरक्षा देऊ शकत नाही आणि त्याला संघातून काढून टाकण्याची मागणी करत आहे, तेव्हा ते स्पष्टपणे दर्शवतं की भारतात खेळण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. नझरुल यांनी असंही स्पष्ट केलं की बांगलादेश या मुद्द्याकडे केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि सन्मानानं पाहत आहे.

बांगलादेश श्रीलंकेत खेळण्यावर आग्रही : बांगलादेश सरकार आणि बीसीबीचा असा विश्वास आहे की श्रीलंका हा स्पर्धेसाठी आणखी एक यजमान देश असल्यानं, बांगलादेशचे सामने तिथंच झाले पाहिजेत. त्यांनी सांगितलं की त्यांना विश्वचषकात खेळायचं आहे आणि ते श्रीलंकेत खेळण्यास तयार आहेत. या मुद्द्यावर त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आणि ठाम आहे. बीसीबी अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी नजरुल यांच्या विधानाचं समर्थन केलं, ते म्हणाले की बोर्डाची चिंता केवळ खेळाडूंपुरती मर्यादित नाही. खेळाडूंव्यतिरिक्त पत्रकार, प्रायोजक आणि क्रिकेट चाहते देखील यात सामील आहेत. सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करणं ही केवळ बोर्डाची जबाबदारी नाही. यासाठी सरकारी परवानगी आवश्यक आहे. त्यांनी असंही सांगितलं की बांगलादेशने यापूर्वी कधीही अशा चिंता व्यक्त केल्या नव्हत्या, परंतु यावेळी परिस्थिती खरोखरच गंभीर आहे.

लवकरच आयसीसीला पत्र पाठवणार : नझरुल यांनी माहिती दिली की बांगलादेश आयसीसीला लेखी पत्र पाठवेल. आयसीसीच्या प्रतिसादाच्या आधारे पुढील रणनीती ठरवली जाईल, परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, भारत आमच्यासाठी सुरक्षित वातावरण नाही. आयसीसीनं श्रीलंकेत सामने आयोजित करण्याची शक्यता आधीच नाकारल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांनाही बीसीबी अध्यक्षांनी फेटाळून लावलं. ते म्हणाले की ही फक्त एक अफवा आहे. आतापर्यंत आयसीसीशी फक्त एक औपचारिक संवाद झाला आहे; आता आम्ही आमचं संपूर्ण विधान लेखी स्वरुपात मांडू.

हेही वाचा :

  1. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियाची स्थिती काय?
  2. बॅझबॉलचा 'बँडबाजा'; ऑस्ट्रेलिया बनला 'अ‍ॅशेस'चा बादशाह, 4-1 नं मालिका विजय
  3. वैभव सूर्यवंशीचं चौथ्या देशाविरुद्ध शतक; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करताच रचला इतिहास