ETV Bharat / sports

विश्वविजेत्या टीम इंडियाचा कांगारुंविरुद्ध सलग दुसऱ्या वनडेत पराभव; मालिकाही गमावली

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिला क्रिकेट संघादरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज होबार्ट इथं खेळवण्यात आला.

AUSW Beat INDW
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 27, 2026 at 4:01 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

होबार्ट AUSW Beat INDW : ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिला क्रिकेट संघादरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज होबार्ट इथं खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं 5 विकेटनं विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 36.1 षटकांत 252 धावा काढत आरामात सामना जिंकला.

दोन फलंदाजांची अर्धशतकं : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, टीम इंडियानं चांगली सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची सलामी भागीदारी केली. मंधाना यांनी 37 चेंडूत 31 धावा केल्या, ज्यात चार चौकारांचा समावेश होता. तिची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाचा डाव कोसळला. प्रतिका रावल आणि हरमनप्रीत कौर यांनी अर्धशतकं झळकावली, परंतु इतर फलंदाजांना यश आलं नाही. रावलनं 81 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात सहा चौकारांचा समावेश होता. कर्णधाराची खेळी करणाऱ्या हरमनप्रीतनं 70 चेंडूत 54 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एक षटकार होता. अमनजोत कौरनं 15 धावा, ऋचा घोषनं 22 धावा, काश्वी गौतमनं 25 धावा आणि क्रांती गौरनं 19 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅशले गार्डनर, अ‍ॅनाबेल सदरलँड आणि अलाना किंगनं प्रत्येकी दोन बळी घेतले.

जॉर्जिया वॉलचं शानदार शतक : भारतानं दिलेल्या 252 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघाची सुरुवात खराब झाली. धावांचा पाठलाग करताना त्यांना 21 धावांवर पहिला धक्का बसला. अलिसा हिली केवळ 6 धावा करुन बाद झाली. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जॉर्जिया वॉलनं फोबे लिचफिल्डला उत्तम साथ दिली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली आणि सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. फोबे लिचफिल्डनं शानदार 80 धावा केल्या, तर जॉर्जिया वॉलची फलंदाजी प्रभावी होती, त्यानं 82 चेंडूत 101 धावांची शतकी खेळी केली. दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, काश्वी गौतम आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी दोन बळी घेतले, तर क्रांती गौडनं एक बळी घेतला.

हेही वाचा :

  1. झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियानं केला अद्भुत पराक्रम; वर्ल्ड कपच्या इतिहासात असं घडलंच नव्हतं
  2. ENG vs NZ सामना पावसात वाहून गेला तर पाकिस्तान न खेळताच बाहेर; समीकरण काय?
  3. 2 जागा 4 संघ... भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यझीलंड; कोणते दोन संघ जाणार पुढे?