ETV Bharat / politics

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गुंतवून ठेवा, मिंधे सेनेला अमित शाहांनी दिली सुपारी'; उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा

शिर्डी येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Uddhav Thackeray shirdi sabha
शिर्डीतील सभेत बोलताना उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 29, 2026 at 10:13 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी - पक्षाला सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह दौरे करत आहेत. मराठवाड्यातील दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर सोमवारी ते शिर्डीत दाखल झाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

ठाकरे यांचा गंभीर आरोप - "प्रत्येक गोष्टीला कुठेतरी शेवट असतो. आता 2029 मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपला वाली कोण, याची चर्चा दिल्लीत भाजपामध्ये सुरू झाली आहे. प्रत्येकाच्या मनात आतापासूनच उकळ्या फुटू लागल्या आहेत की, तो झाला तर मी का नाही? या शर्यतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव येऊ शकते, असे काहींना वाटू लागल्यामुळे त्यांना आताच बदनाम करा, असे कारस्थान सुरू आहे," असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोण-कोण आहे हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. "अमित शाह यांनी महाराष्ट्रातील मिंधे सेनेच्या प्रमुखाला देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या गुंतवून ठेवण्याची सुपारी दिली आहे," असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

शिर्डीतील सभेत बोलताना उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)

भाजपापेक्षा मिंधे सेना महाराष्ट्रात मोठी झाली - उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे गणित मांडत भाजपावर टीका केली. 2019 मध्ये शिवसेनेचे 18 आणि भाजपाचे 22 ते 23 खासदार निवडून आले होते. मात्र, युती तुटल्यानंतर शिवसेनेचे 9 आणि भाजपाचे 9 खासदार राहिले, तर शिवसेनेकडे 6 ते 7 खासदार गेले. "जर खासदार फोडायचेच होते, तर ते स्वतःच्या पक्षात घ्यायला हवे होते. दुसऱ्याच्या पक्षात का पाठवले? शिवसेनेने आमचे खासदार फोडून स्वतःची वाढ केली. भाजपापेक्षा मिंधे सेना आज महाराष्ट्रात मोठी झाली आहे. उद्या पंतप्रधान निवडीची वेळ आली तर ही शहा-सेना कोणाला मतदान करणार?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांच्या जागा कमी झाल्या. त्यामुळं फडणवीसांना गप्प बसवण्याचा हा शहा-सेनेचा डाव असल्याचा टोला त्यांनी लगावला.

खाऊसाहेब केवळ नैवेद्य शोधतात - उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिवसेनेत गेलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, "वाकचौरे जाहीरपणे सांगतात की, आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही. कारण बोललो तर लोक जोड्याने मारतील. ते मला देवमाणूस म्हणतात." यावर टोमणा मारताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी आताच साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो आहे. मंदिरात गेल्यानंतर तुमचे लक्ष साईबाबांच्या आशीर्वादाकडे असते की नैवेद्याकडे? आमच्याकडे आलेले हे खाऊसाहेब केवळ नैवेद्य म्हणजे सत्ता आणि पदे खायला आले होते. उद्धव ठाकरे देवमाणूस आहेत, हे मानायचे; पण लक्ष मात्र नैवेद्याकडे ठेवायचे अशी यांची वृत्ती आहे." भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना "आपला खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका" असा आदेश दिला.

अध्यक्षांकडून मराठी शिका - दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात आहेत, असे म्हटले होते. त्याचा पुनरुच्चार त्यांनी सोमवारी केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी मनुष्य आहे. मला पंखच नाहीत. त्यामुळे ते छाटण्याचा प्रश्न येतच नाही," असे उत्तर दिले होते. त्यावर शिर्डीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात मला पंख नाही. मी पक्षी नाही. माझे पंख कसे छाटणार? अहो हा वाक्प्रचार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून मराठी शिका.

हेही वाचा -

  1. 'नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या फाशीची तातडीनं अंमलबजावणी करा', उद्धव ठाकरेंची मागणी, मुख्यमंत्र्यांबद्दल केलं मोठं विधान
  2. भाजपा आता भारतीय नव्हे तर पाकिस्तान जनता पार्टी; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका