ETV Bharat / international

भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देणार, संरक्षण संबंध अधिक मजबूत होणार

अत्यावश्यक खनिजे, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा, औषधनिर्माण आणि सागरी सुरक्षा यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी जवळपास डझनभर करारांवर स्वाक्षरी केली.

India To Supply BrahMos Missiles to Indonesia
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. (IANS)
author img

By PTI

Published : July 7, 2026 at 5:54 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

जकार्ता : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल इंडोनेशियात दाखल झाले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्यात आज विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी इंडोनेशियाला ब्रह्मोस आणि 'अस्त्र' क्षेपणास्त्रांचा पुरवठा, सागरी सुरक्षा वाढवणे आणि अत्यावश्यक खनिज पुरवठा साखळी मजबूत करणे हे चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.

अत्यावश्यक खनिजे, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा, औषधनिर्माण आणि सागरी सुरक्षा यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी जवळपास डझनभर करारांवर स्वाक्षरी केली. दरम्यान, भारत-इंडोनेशिया व्यापक सामरिक भागीदारी 2018 च्या फ्रेमवर्कमध्ये व्यापार आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशानं आयोजित केलेल्या तीन-देशीय दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जकार्ता इथं दाखल झाले, जिथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान मिळालेल्या यशानंतर दोन्ही देशांचे संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं इंडोनेशियानं भारताची हवेतून हवेत मारा करणारी 'अस्त्र' क्षेपणास्त्रं आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियासोबतचा ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार हा भारतानं व्हिएतनाम आणि फिलीपिन्ससोबत केलेल्या तत्सम करारांनंतर झाला आहे. इंडोनेशियाला पुरवण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची नेमकी संख्या अद्याप कळलेली नाही. अत्यावश्यक खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी, भारतानं इंडोनेशियाच्या पोलाद, निकेल आणि दुर्मीळ मृदा स्थायी चुंबकांच्या उत्पादनात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आजच्या जगात तंत्रज्ञान पुरवठा साखळीची ताकद अत्यंत महत्त्वाची आहे. जीवनावश्यक खनिजे आणि पोलाद क्षेत्रातील पुरवठा साखळी आणखी मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा करार झाला आहे. तसंच स्टेनलेस स्टील आणि रेअर-अर्थ मॅग्नेट्सच्या बाबतीत आमच्या कंपन्यांमधील भागीदारीची नवी सुरुवात होत आहे." भारत आणि इंडोनेशिया यांनी मलाक्का सामुद्रधुनीच्या पलीकडे आणि भारताच्या ग्रेट निकोबार पोर्ट प्रकल्पापासून 100 मैल अंतरावर असलेल्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सबांग बंदराचा संयुक्तपणे विकास करण्यासही सहमती दर्शवली.

चर्चेनंतर आपल्या माध्यम निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "2018 मध्ये आम्ही स्थापन केलेली व्यापक सामरिक भागीदारी आज नवीन पाऊलं टाकत आहे. आम्ही विकास, सुरक्षा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक पावलं पुढं टाकत आहोत." पुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मला विश्वास आहे की आजचा दिवस भारत-इंडोनेशिया भागीदारीतील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील वाढता विश्वास द्विपक्षीय संरक्षण, सुरक्षा आणि सागरी सहकार्याला बळकट करत आहे. आज भारत आणि इंडोनेशियाने संरक्षण देवाणघेवाण, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-बंगलोरचे कॅम्पस स्थापन करण्याच्या निर्णयाची घोषणाही केली. पुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आम्हाला आनंद आहे की भारताची UPI प्रणाली इंडोनेशियाच्या पेमेंट प्रणालीशी जोडली जाणार आहे. यामुळं व्यवसाय सुलभता आणि प्रवास सुलभता या दोन्हींना चालना मिळेल." तसंच दोन्ही बाजूंनी नील अर्थव्यवस्था, सागरी व्यापार आणि बंदर विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचाही निर्णय घेतला.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह अनेक जागतिक आव्हानांवरही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "या जागतिक अशांततेच्या काळात, संवाद आणि मुत्सद्देगिरीची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे, असा भारताचा विश्वास आहे. तसंच पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर, आम्ही द्वि-राज्य समाधान आणि दीर्घकालीन शांततेचे समर्थन करतो."

हेही वाचा :

  1. कोचीमध्ये ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात, महिलांच्या उन्नतीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा
  2. हाफिज सईदनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट रचला; NIA कडून आरोपपत्र दाखल
  3. विद्यार्थ्याला येत होते पाकिस्तानमधून फोन, लॉजमध्ये केली आत्महत्या