ETV Bharat / health-and-lifestyle
तांदूळ शिजवण्यापूर्वी फॉलो करा या टिप्स; होणार आश्चर्यकारक फायदे
तांदूळ भिजवल्याने त्याच्या पृष्ठभागावरील अनावश्यक थर निघून जातो आणि ते जलद शिजण्यास मदत होते. शिवाय, तांदूळ भिजवल्याने आरोग्यविषयक अनेक फायदे होतात.

Published : January 7, 2026 at 7:50 PM IST
WHY YOU SHOULD WASH RICE: भात हे जगभरातील, विशेषतः आशियामधील एक प्रमुख अन्न आहे आणि लोक तो दररोज खातात. भात उर्जेचा चांगला स्रोत असून तो पचण्यास सोपा आहे. मात्र, भात रक्तातील साखरेची पातळी (विशेषतः पांढरा तांदूळ) लवकर वाढवू शकते आणि त्यात फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते आणि ते खाल्ल्यास झोप येऊ शकते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का होते? यावर तज्ञांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया...
जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात: बरेच लोक तांदूळ धुतल्यानंतर लगेच शिजवतात. परंतु, तज्ञांचं म्हणणं आहे की, ही पद्धत योग्य नाही; शिजवण्यापूर्वी तांदूळ भिजवणे महत्वाचे आहे. कारण असे न करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. पूर्वी वडीलधारी लोक म्हणायचे की, तांदूळ शिजवण्यापूर्वी काही काळ पाण्यात भिजवावेत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. ही केवळ चव किंवा सवयीची बाब नाही तर एक आरोग्यदायी सवय आहे. आजकाल, बरेच लोक कामाच्य लगबगीत असतात. यामुळे तांदूळ धुतल्यानंतर लगेच शिजवतात. तज्ञांच्या मते, तांदूळ पाण्यात भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया की शिजवण्यापूर्वी तांदूळ किती वेळ भिजवावेत आणि भिजवलेले तांदूळ शिजवून खाण्याचे फायदे.

भात शिजवण्यापूर्वी भिजवण्याचे फायदे
- काही अभ्यासातून असं आढळून आलं की, तांदळामध्ये फायटिक अॅसिड असते. हे फायटिक अॅसिड विशेषतः लोह, जस्त आणि कॅल्शियमचे शोषण रोखते. याचा अर्थ असा की, हे पोषक घटक आपल्या शरीरात योग्यरित्या शोषले जात नाहीत. तसंच धुतल्यानंतर तांदूळ भिजवल्याने फायटिक अॅसिड निघून जातो आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते. म्हणून, झिंक आणि लोहाच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांनी स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ पूर्णपणे भिजवण्याची सवय लावावी.
- नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अभ्यासात असं सूचित करण्यात आलं आहे, की तांदळात नैसर्गिकरित्या आर्सेनिक असू शकते. आर्सेनिक हा माती आणि पाण्यात आढळणारा एक विषारी घटक आहे. लागवडीदरम्यान वनस्पती ते शोषून घेतात. तांदूळ इतर धान्यांपेक्षा जास्त आर्सेनिक शोषून घेतात. तांदूळ भिजवल्याने आर्सेनिकचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणूनच तज्ञांचं म्हणणं आहे की, शिजवण्यापूर्वी तांदूळ भिजवणे अत्यंत गरजेचं आहे.
- तांदूळ भिजवल्याने त्याच्या पृष्ठभागावरील नको असलेले थर निघून जातात आणि ते जलद शिजण्यास मदत होते. शिवाय, भिजवल्याने तांदूळ पूर्णपणे आणि समान रीतीने शिजतो. भात चिकट किंवा कोरडाही होत नाही. भिजवलेले तांदूळ लवकर मऊ होतात, ज्यामुळे ते शिजवणे सोपे होते. तसंच ते पोटात चिकट होण्यापासून देखील प्रतिबंधित करते. तज्ञांचं म्हणणं आहे, की भिजवल्याने तांदळाची चव देखील सुधारते.

अन्य फायदे
- तांदूळ भिजवल्याने एंजाइम्स तांदळातील जटिल कार्बोहायड्रेट्सचे साध्या साखरेत विघटन करण्यास मदत करतात, ज्यामुळे आपल्या शरीराला हे पोषक घटक शोषणे सोपे होते.
- हे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील कमी करते. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. अन्नातील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवतात हे GI मोजते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे.
तांदूळ किती वेळ भिजवावेत?
- पांढरे तांदूळ 15-20 मिनिटे भिजवून ठेवणे पुरेसे आहे.
- बासमती तांदूळ 20-30 मिनिटे भिजत ठेवा.
- तपकिरी तांदूळ कमीत कमी 6-8 तास भिजवल्याने ते लवकर शिजतात आणि पचायला सोपे होतात.
- दुसरीकडे, संपूर्ण धान्याचे तांदूळ 8-12 तास भिजवून ठेवणे चांगले.
- तज्ञ म्हणतात की, तांदूळ भिजवण्यापूर्वी दोन किंवा तीन वेळा धुणे चांगले.
- पांढरे तांदूळ 3-4 तासांपेक्षा जास्त पाण्यात भिजवू नका. असे केल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजे बाहेर पडू शकतात आणि तांदळाचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते.

