मुकेश खन्ना आणि समय रैना यांच्यात शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र, अभिनेत्यानं पोस्ट शेअर करून केली टीका...
मुकेश खन्ना आणि समय रैना यांच्यात चांगलाच वाद वाढला आहे. एका सोशल मीडिया शोमधील वक्तव्यानंतर अभिनेत्यानं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : April 9, 2026 at 12:31 PM IST
हैदराबाद : 'महाभारत' आणि 'शक्तिमान'सारख्या टीव्ही मालिकांमुळं 80 आणि 90च्या दशकात घराघरात पोहोचलेले मुकेश खन्ना हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी कॉमेडियन समय रैनावर टीका केली आहे. सध्या दोघेही एकमेकांवर तिखट शब्दांचा वापर करत आहे. अलीकडेच, समय रैनानं 'स्टिल अलाइव्ह' या शोमध्ये मुकेश खन्ना यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. यानंतर अभिनेत्यानं सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला. यानंतर चाहतेही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
मुकेश खन्नाची पोस्ट चर्चेत : मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते समय रैनावर टोमणा मारताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी समयला गाढवावर बसलेला एक एडिट केलेला फोटो शेअर केला आहे. फोटोबरोबर त्यांनी लिहिलं,"समय रैना, तू फक्त गाढवावर बसण्याच्या लायकीचा आहे, तेही चेहरा काळा करून." या पोस्टला त्यांनी लांबलचक कॅप्शन लिहून तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
मुकेश खन्ना यांचा समय रैनावर सडेतोड हल्ला : पोस्टच्या कॅप्शनमध्ये मुकेश खन्ना यांनी लिहिलं,'कुत्र्याची शेपटी वाकडीच राहते. तिला लाखो बाटल्यांमध्ये टाका, बाहेर काढा, आणि ती पुन्हा वाकडीच राहते. समय रैनालाही शेपटी आहे. तुम्ही तिला कितीही मारले किंवा सरळ केले तरी ती पुन्हा वाकडीच होते.' यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, 'समय साधासुधा प्राणी नाही. तो भाजलेला प्राणी आहे. घाणीच्या आगीत भाजलेला, शिजवलेला. संपूर्ण देशानं त्याला शिव्या घातल्या. तो पुन्हा एका निर्लज्ज माणसासारखा परत आला आहे, मार खाण्यासाठी. आता फक्त एकच गोष्ट उरली आहे. त्याचा चेहरा काळा करायला हवा, त्याला गाढवावर बसवून देशभरातील शहरांमधून शिव्या-श्राप देत धिंड काढायला हवी. जिथे मुले त्याच्यावर अंडी आणि टोमॅटो फेकतील. कारण त्यानं त्यांच्या सुपरहिरो, शक्तिमानचा अपमान केला!!!'
वाद सोशल मीडियावर वाढला : आता लोक पोस्टवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. समय रैनानं त्याच्या 'स्टिल अलाइव्ह' आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोभोवतीच्या वादाचा उल्लेख केल्यावर हा संपूर्ण प्रकार सुरू झाला. यावेळी त्यानं प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक असंबंधित लोकांबद्दल भाष्य केलं. त्यानं मुकेश खन्ना यांचं नाव घेऊन असंही म्हटलं की, "शक्तिमान आला आहे, आपण शक्तिमानशी कसे लढू शकतो?, जेव्हा 'शक्तिमान' टीव्हीवर असायचा, तेव्हा अनेक मुले त्याची नक्कल करण्याच्या प्रयत्नात इमारतींवरून उड्या मारायची. ते प्रश्न उपस्थित करायचे, 'तुम्ही मुलांना मारले, आता तुम्ही नैतिकता घेऊन बसले आहेत." या वक्तव्यामुळं मुकेश खन्ना संतापले आणि त्यांनी एका पोस्टद्वारे समयवर चांगलीच टीका केली. हा संपूर्ण वाद सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकजण मुकेश खन्ना यांना पाठिंबा देत आहेत. याशिवाय काहीजण समय रैनाला पाठिंबा देत आहेत. हे प्रकरण आणखी चिघळले आहे. समय रैना सध्या त्याच्या 'स्टिल अलाइव्ह' या नवीन शोमुळं चर्चेत आहे, या शोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमधील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, जे प्रेक्षकांना खूप पसंत पडले आहेत.

