Exclusive Interview : कॅमेऱ्याच्या मागे उभं राहणं मला अधिक नैसर्गिक वाटतं! -नागराज पोपटराव मंजुळे
नागराज मंजुळे 'फ्रेम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'नं त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

Published : July 7, 2026 at 2:49 PM IST
मुंबई : 'सैराट'नं मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अभूतपूर्व यश मिळवत अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. फँड्री, सैराट, नाळ (निर्माता) आणि झुंड यांसारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी सामाजिक वास्तव प्रभावीपणे पडद्यावर मांडलं. त्यांच्या 'फँड्री' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला, तर 'फँड्री' आणि 'नाळ' या चित्रपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी प्रशंसा मिळाली.
काही चित्रपटांमध्ये नागराज मंजुळे अभिनेता म्हणून दिसले आहेत. नागराज मंजुळे हे विक्रम पटवर्धन दिग्दर्शित 'फ्रेम' या चित्रपटातून ते मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. या निमित्तानं त्यांनी 'ईटीव्ही भारत' वार्ताहर कीर्ति कदम यांच्याशी अभिनयाचा अनुभव, दिग्दर्शन, 'फ्रेम'मधील भूमिका आणि सिनेमाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन याविषयी मनमोकळा संवाद साधला.
ईटीव्ही भारत : 'मटका किंग'च्या यशाबद्दल तुमचं अभिनंदन! पडद्यामागून पडद्यासमोर येण्याच्या प्रवासाविषयी काय सांगाल?
नागराज मंजुळे: खूप छान आणि वेगळा अनुभव होता. खरं सांगायचं तर मी स्वतःला पूर्णवेळ अभिनेता मानत नाही. माझी ओळख दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनच अधिक आहे. पण विक्रम पटवर्धनला असं वाटलं की या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा योग्य पर्याय असू शकत नाही. त्याचा माझ्यावरचा विश्वास महत्त्वाचा होता. जेव्हा त्यानं कथा आणि पात्र समजावून सांगितलं, तेव्हा मला त्यात प्रामाणिकपणा आणि वास्तव जाणवलं. त्यामुळे हा प्रवास स्वीकारावा असं वाटलं. कॅमेऱ्याच्या मागून समोर येताना काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. दिग्दर्शक म्हणून कलाकारांकडून काय अपेक्षा असतात, हे मला माहीत होतंच; पण अभिनेता म्हणून त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अनुभवणं हा वेगळाच अनुभव होता.
ईटीव्ही भारत : तुम्ही नेहमीच वास्तववादी सिनेमांसाठी ओळखले जाता. 'फ्रेम'ची पटकथा तुमच्याकडे आली तेव्हा त्यात असं काय होतं? ज्याने तुम्हाला आकर्षित केलं?
नागराज मंजुळे : सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विक्रमला वाटलं की 'चंदू पानसरे' हे पात्र मीच साकारावं. एखादा दिग्दर्शक तुमच्यावर इतका विश्वास दाखवतो, ही मोठी गोष्ट असते. त्याचबरोबर या चित्रपटाची कथा केवळ मनोरंजन करणारी नाही, तर आजच्या समाजातील काही महत्त्वाचे आणि अस्वस्थ करणारे प्रश्न मांडणारी आहे. माध्यमांचं बदलतं स्वरूप, सत्य आणि संवेदनशीलतेचा संघर्ष, पत्रकारितेतील नैतिकता अशा अनेक गोष्टी हा चित्रपट स्पर्श करतो. त्यामुळे ही कथा मला केवळ अभिनेता म्हणून नाही, तर एक संवेदनशील माणूस आणि फिल्ममेकर म्हणूनही महत्त्वाची वाटली.
ईटीव्ही भारत : तुमच्या नावासोबत प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा असतात, ही फिल्म करताना काही दडपण जाणवलं का?
नागराज मंजुळे : प्रेक्षकांच्या अपेक्षा असणं ही कोणत्याही कलाकारासाठी आनंदाची आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट असते. माझ्या नावाशी लोकांनी काही विशिष्ट प्रकारच्या कथा, वास्तववादी मांडणी आणि आशयपूर्ण चित्रपट जोडले आहेत, त्यामुळे त्या अपेक्षा मला पूर्णपणे समजतात. पण या चित्रपटासाठी काम करताना मी त्या अपेक्षांचं ओझं मनावर घेतलं नाही. कारण मी या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर एक अभिनेता म्हणून काम करत होतो.
खरं तर अभिनय ही माझी प्राथमिक ओळख नाही. माझा जास्त वेळ आणि ऊर्जा दिग्दर्शन, लेखन आणि कथा घडवण्यात जाते. कॅमेऱ्याच्या मागे उभं राहणं मला अधिक नैसर्गिक वाटतं. अभिनय मला आवडतो, पण तो मी फक्त अशाच भूमिका आणि कथा स्वीकारतो ज्या मला आतून पटतात आणि ज्यात काहीतरी वेगळं करण्याची संधी असते. या चित्रपटात विक्रम पटवर्धनने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. त्यानं 'चंदू पानसरे' हे पात्र माझ्यासमोर इतक्या स्पष्टपणे उभं केलं की मला ते साकारताना फार विचार करावा लागला नाही. दिग्दर्शक म्हणून त्याचा दृष्टिकोन स्पष्ट होता आणि अभिनेता म्हणून माझं काम त्या दृष्टिकोनाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं होतं. विक्रमने प्रत्येक दृश्य खूप संयमाने समजावून सांगितलं आणि माझ्याकडून हवं तसं काम करून घेतलं. म्हणूनच या चित्रपटात दडपणापेक्षा शिकण्याचा आणि नव्या अनुभवाचा आनंद जास्त होता. दुसऱ्या दिग्दर्शकाच्या दृष्टीने स्वतःकडे पाहण्याची आणि त्याच्या विश्वाचा एक भाग बनण्याची संधी मला मिळाली. शेवटी प्रेक्षकांना हा चित्रपट आणि माझं पात्र मनापासून आवडलं, तर त्यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच नाही.
ईटीव्ही भारत : तुम्ही स्वतः एक उत्तम दिग्दर्शक आहात, दुसऱ्या दिग्दर्शकाच्या सेटवर अभिनेता म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता?
नागराज मंजुळे : मी स्वतःला आजही शिकणारा विद्यार्थीच समजतो. मी काही चित्रपट दिग्दर्शित केले असले, तरी चित्रपटसृष्टीत शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही. प्रत्येक नवीन चित्रपट, प्रत्येक नवा दिग्दर्शक आणि प्रत्येक नवं पात्र तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवून जातं. त्यामुळे दुसऱ्या दिग्दर्शकाच्या सेटवर काम करताना माझ्या मनात 'मीही दिग्दर्शक आहे' असा विचार कधीच आला नाही.
माझ्या मते, प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची एक भाषा, दृष्टिकोन आणि कथा सांगण्याची शैली असते. तो ज्या पद्धतीने त्याचं विश्व उभं करतो, त्या विश्वात अभिनेता म्हणून पूर्णपणे सामावून जाणं हीच अभिनेत्याची खरी जबाबदारी असते. दिग्दर्शक म्हणून मी स्वतः कलाकारांकडून हाच विश्वास आणि समर्पण अपेक्षित ठेवतो. त्यामुळे अभिनेता म्हणूनही मी तेच तत्त्व पाळण्याचा प्रयत्न केला.
विक्रम पटवर्धनचा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट होता. त्यानं प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक भावनेमागचं कारण खूप संयमानं समजावून सांगितलं. त्यामुळे मला त्याच्या दृष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून काम करता आलं. अनेकदा तो एखाद्या छोट्याशा हावभावाबद्दल किंवा शांततेच्या क्षणाबद्दलही चर्चा करायचा, कारण त्याच्यासाठी प्रत्येक तपशील महत्त्वाचा होता. अभिनेता म्हणून अशा दिग्दर्शकासोबत काम करणं हा खूप समृद्ध करणारा अनुभव असतो.
या प्रक्रियेत मला दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांकडे नव्या नजरेनं पाहता आलं. कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून निर्णय घेणं आणि कॅमेऱ्यासमोर उभं राहून त्या निर्णयांवर विश्वास ठेवणं, या दोन वेगळ्या पण एकमेकांना पूरक प्रक्रिया आहेत. या चित्रपटामुळे त्या दोन्ही बाजूंचा अनुभव अधिक समृद्ध झाला. त्यामुळे हा केवळ अभिनयाचा अनुभव नव्हता, तर एक फिल्ममेकर म्हणूनही मला खूप काही शिकवून जाणारा प्रवास होता.
ईटीव्ही भारत : फोटो जर्नलिस्टची भूमिका साकारताना कॅमेरा आणि लेन्सबाबतच्या तुमच्या अनुभवाचा किती फायदा झाला?
नागराज मंजुळे : नक्कीच त्याचा खूप फायदा झाला. चित्रपटनिर्मिती करताना कॅमेऱ्याशी माझा सतत संबंध येत असतो. दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याची भाषा, फ्रेम, लेन्स, अँगल्स आणि दृश्य मांडण्याची प्रक्रिया मला माहिती आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कॅमेरा हाताळताना किंवा त्याच्यासोबत सहज वावरताना फार अडचण आली नाही.
पण सिनेमाचा कॅमेरा आणि फोटो जर्नलिस्टचा कॅमेरा यामध्ये खूप मोठा फरक असतो. दिग्दर्शक म्हणून आपण एखादं दृश्य तयार करतो, त्याचं नियोजन करतो; तर फोटो जर्नलिस्टला वास्तवात घडणाऱ्या घटनांमध्ये योग्य क्षण टिपायचा असतो. त्याच्याकडे पुन्हा टेक घेण्याची संधी नसते. त्यामुळे त्याची निरीक्षणशक्ती, निर्णयक्षमता आणि सतत जागरूक राहण्याची वृत्ती खूप महत्त्वाची असते. हे समजून घेणं आणि ते अभिनयातून दाखवणं ही खरी कसोटी होती.
विक्रम पटवर्धनने यासाठी खूप मेहनत घेतली. त्याला फोटो जर्नलिस्टचं जग अगदी जवळून माहिती आहे. पत्रकार घटनास्थळी कसे पोहोचतात, गर्दीत कसं काम करतात, कॅमेरा कसा हाताळतात, एखादा फोटो मिळवण्यासाठी किती धावपळ करावी लागते, त्यांची शरीरभाषा कशी असते आणि प्रत्येक क्षणाकडे ते कोणत्या नजरेने पाहतात, या सगळ्या गोष्टी त्याने खूप बारकाईने समजावून सांगितल्या.
मीही या भूमिकेसाठी काही फोटो जर्नलिस्टचं काम जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हालचाली, लोकांशी संवाद साधण्याची पद्धत, सतत एखाद्या महत्त्वाच्या क्षणाच्या शोधात असलेली त्यांची नजर आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याची त्यांची सवय याचं निरीक्षण केलं. त्यामुळे हे पात्र फक्त कॅमेरा हातात घेतलेला माणूस न वाटता, त्या व्यवसायात अनेक वर्षं काम केलेला एक अनुभवी फोटो जर्नलिस्ट वाटावा, यासाठी आम्ही प्रयत्न केला.
माझ्या मते, अशा भूमिका करताना केवळ तांत्रिक तयारी पुरेशी नसते. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन, त्याचं जगणं आणि त्याच्या व्यवसायामागची संवेदनशीलता समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. 'फ्रेम' करताना ही गोष्ट खूप जवळून अनुभवायला मिळाली आणि त्यामुळे हे पात्र अधिक प्रामाणिकपणे साकारता आलं.
ईटीव्ही भारत : अमेय वाघसोबत पहिल्यांदाच काम केलं, तुमच्या दोघांमधील बाँडिंगबद्दल काय सांगाल?
नागराज मंजुळे : अमेयसोबत काम करण्याचा अनुभव खूप आनंददायी आणि समाधान देणारा होता. आम्ही यापूर्वी कधी एकत्र काम केलं नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला एकमेकांना कलाकार म्हणून समजून घेण्याची उत्सुकता होती. पण पहिल्याच काही दिवसांत आमच्यात खूप सहज संवाद आणि चांगलं ट्युनिंग तयार झालं. अमेय अत्यंत गुणी, मेहनती आणि संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक दृश्यासाठी तो खूप तयारी करून येतो आणि पात्राचा सखोल अभ्यास करतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना समोरच्याकडूनही अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.
चित्रपटात आमचं नातं सीनियर आणि ज्युनियर फोटो जर्नलिस्टचं आहे. त्या नात्यात अनुभव, विचार आणि काम करण्याच्या पद्धतीतील फरक दिसतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही दोघंही कलाकार म्हणून एकमेकांचा मनापासून आदर करतो. अमेयचा अनुभवही खूप मोठा आहे. रंगभूमी, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांत त्याने उत्कृष्ट काम केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
सेटवरचं वातावरण नेहमीच खूप सकारात्मक आणि उत्साही असायचं. आम्ही गंभीर विषयांवर चर्चा करायचो, पण त्याचवेळी भरपूर विनोद आणि मस्करीही व्हायची. अनेकदा एखाद्या गंभीर सीनच्या आधी आम्ही काहीतरी मजेशीर बोलून वातावरण हलकं करायचो. त्यामुळे कामाचा ताण जाणवत नसे आणि प्रत्येक दिवस आनंदात जायचा. त्या सहज मैत्रीचा आणि विश्वासाचा परिणाम आमच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीवरही झाला. माझ्या मते, दोन कलाकारांमध्ये चांगलं ट्युनिंग असेल, तर ते पडद्यावरही स्पष्टपणे दिसतं. 'फ्रेम'मध्ये आमच्या पात्रांमधील नातं हळूहळू विकसित होत जातं आणि त्यातली नैसर्गिकता प्रेक्षकांना जाणवेल, असा मला विश्वास आहे. अमेयसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली, तर ती मी नक्कीच आवडीने स्वीकारेन.
ईटीव्ही भारत : अमेय वाघ आणि नागराज मंजुळे यांची ही एकत्र 'फ्रेम' प्रेक्षकांसाठी किती खास असेल?
नागराज मंजुळे : माझ्या मते ही जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळी आणि ताजी ठरेल. विक्रमने 'चंदू पानसरे' आणि 'सिद्धार्थ देशमुख' ही दोन पात्रं अतिशय सुंदर पद्धतीने उभी केली आहेत. दोघांचे स्वभाव, विचार आणि काम करण्याची शैली वेगळी असली, तरी त्यांच्यातील नातं हळूहळू उलगडत जातं. त्या प्रवासात प्रेक्षकांना अनेक भावनिक, विचार करायला लावणारे आणि मनोरंजक क्षण अनुभवायला मिळतील. मला विश्वास आहे की अमेय आणि माझी ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
हेही वाचा...

