तरुणीवर अत्याचार केला अन् चौथ्या मजल्यावरून फेकलं; प्रियकरासह एकाला अटक!
एका तरुणीवर अत्याचार करून तिला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. यात तिचा मृत्यू झाला.

Published : February 28, 2026 at 2:50 PM IST
पारादीप/जगतसिंहपूर (ओडिशा) : जगतसिंहपूर जिल्ह्यातील पोलिसांनी पारादीप शहराच्या बाहेरील तारिणी गडा इथं एका तरुणीच्या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दरम्यान, एका तरुणीवर अत्याचार करून तिला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला आणि तरुणीच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अंकित वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, पोलिसांनी अभयचंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढिंकिया येथील सोमनाथ ओझा (31) आणि झारखंड येथील शुभम कुमार सिंह (24) या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लवकर लग्न करण्याचा आग्रह : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतसिंहपूरच्या तिरटोल भागातील मृत तरुणीचे तिचा प्रियकर सोमनाथ ओझासोबत दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. 22 फेब्रुवारी रोजी तरुणीनं घर सोडलं आणि तिच्या कुटुंबीयांना सांगितलं की, ती सरला मंदिरात जात आहे, परंतु त्याऐवजी ती सोमनाथला भेटायला गेली आणि त्याला लवकर लग्न करण्याचा आग्रह केला. मात्र, सोमनाथनं लग्न नंतर करण्याचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर, तो तिला रहमा बाजारात निराधार अवस्थेत सोडून पळून गेला.
आरोपींना न्यायालयीन कोठडी : पुढं पोलिसांच्या माहितीनुसार, जेव्हा ती रहमा बाजारात अस्वस्थ अवस्थेत होती, तेव्हा झारखंडमधील शुभम कुमार सिंहनं तिला त्याच्या दुचाकीवरून लिफ्ट दिली आणि तिला पारादीपला आणलं. तिथं त्यानं रात्रभर तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात तो घटनास्थळावरून पळून गेला. तर 23 फेब्रुवारीला सकाळी तरुणीचा मृतदेह आढळला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला 23 फेब्रुवारीला दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि 27 फेब्रुवारीला त्यांना अटक केली. त्याच दिवशी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
आणखी किती निष्पाप जीव जातील? : दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक यांनी या घटनेचा निषेध केला आणि अलिकडच्या अत्याचाराच्या घटनांमधील महिलेला आणि इतर पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आणखी किती निष्पाप जीव जातील? अल्पवयीन मुलींपासून ते अपंग मुलींपर्यंत, कोणीही सुरक्षित नाही. मग, राज्यात अजूनही कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे का? अंगुलमधील कन्हरी, संबलपूरमधील कुचिंडा आणि पारादीप येथून येणाऱ्या गुन्ह्यांच्या बातम्या खूपच त्रासदायक आहेत. सर्वत्र असुरक्षितता आहे!"
आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी : माजी मुख्यमंत्री पटनायक पुढं म्हणाले की, "सरकार महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल लांबलचक भाषणं देतं, परंतु प्रत्यक्षातील परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसाढवळ्याही भीतीचं वातावरण आहे. अशा घृणास्पद घटना वारंवार घडत असूनही, योग्य आणि कठोर कारवाईचा अभाव गुन्हेगारांना बळ देत आहे. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी आणि राज्यात कायद्याचे राज्य राखण्यासाठी सरकारनं जलद पावलं उचलली पाहिजेत." याचबरोबर, बीजेडी जिल्हा महिला अध्यक्षा लोरा महापात्रा यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हेही वाचा :

