ETV Bharat / bharat

"आम्हीच खरे आणि मुख्य विरोधी पक्ष आहोत", ऋतब्रता बॅनर्जींचा दावा; 58 बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मंजुरी

आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्यासह 58 बंडखोर नेत्यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे.

Ritabrata Banerjee
ऋतब्रता बॅनर्जी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 3, 2026 at 8:00 PM IST

|

Updated : June 3, 2026 at 8:06 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्यासह 58 बंडखोर नेत्यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. तसंच अध्यक्षांनी ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली साठ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांची भेट घेतली आणि "आम्हीच टीएमसीचा खरा गट असून ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मंजुरी द्यावी," असं सांगितलं.

दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसनं सुरुवातीला बालीगंजचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची पक्षाचे विधिमंडळ नेते म्हणून निवड केली होती. त्यानंतर, पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीसांनी विधानसभेला एक पत्र पाठवून अधिकृत निर्णय कळवला आणि शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्याची विनंती केली होती. मात्र, पत्रावरील सह्यांमध्ये फेरफार केल्याचे आरोप लवकरच समोर आलं होतं. सीआयडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपास अधिकाऱ्यांनी अनेक आमदारांच्या घरी भेटी दिल्या आणि अभिषेक बॅनर्जी यांनाही नोटीस बजावण्यात आली. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नबन्ना इथं एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, तृणमूलचे दोन आमदार ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा यांनी ही बनावटगिरी उघडकीस आणली होती. त्यानंतर लगेचच तृणमूल काँग्रेसनं दोन्ही आमदारांना पक्षातून काढून टाकलं. या घटनेनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली.

तृणमूल काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात उघडपणे बंड पुकारलं. दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र भूमिका घेतली. तसंच किमान 50 आमदार ऋतब्रता यांच्यासोबत सामील झाल्याची चर्चा पसरली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या होत्या. पक्षांतरबंदी कायद्याला बगल देण्यासाठी ऋतब्रता आणि त्यांच्या गटाला किमान 53 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र, बुधवारी सकाळी हे स्पष्ट झालं की, त्यांची संख्या त्या मर्यादेपेक्षा खूप जास्त होती.

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि बनावट सह्यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऋतब्रता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी या त्यांच्या नेत्या असून पक्षात फूट पाडण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. 58 बंडखोर नेत्यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर आणि विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाल्यानंतर ऋतब्रता बॅनर्जी म्हणाले की, "संसदीय निकषांनुसार, पश्चिम बंगाल विधानसभेतील आम्हीच खरे आणि मुख्य विरोधी पक्ष आहोत, तसंच "जावेद खान, संदीपान साहा, सबिना यास्मिन आणि शिउली साहा हे टीएमसी विधिमंडळ पक्षाचे उपनेते असतील," असंही त्यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसने सर्व अंतर्गत समित्या केल्या बरखास्त

पश्चिम बंगाल विधानसभेतील आपल्या विधिमंडळ पक्षात नवीन गट स्थापन झाल्यानंतर आणि पक्षातून हकालपट्टी केलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर, तृणमूल काँग्रेसनं बुधवारी पक्षाच्या सर्व अंतर्गत समित्या तसंच सर्व संलग्न संघटनांच्या समित्या बरखास्त केल्या. "सखोल विचारविनिमयानंतर पश्चिम बंगालमधील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सर्व समित्या तसंच सर्व संलग्न संघटना तत्काळ प्रभावानं विसर्जित करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे," असं अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. 'आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस'! बंगालमध्ये एकनाथ शिंदे पॅटर्नची चर्चा; ममतांच्या विरोधात 59 आमदारांचं बंड, टीएमसी फुटण्याच्या मार्गावर
  2. CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टलवर वाढता प्रतिसाद; 28 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केले अर्ज
  3. आज ना उद्या कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना अटक होणार - ॲड. असीम सरोदे
Last Updated : June 3, 2026 at 8:06 PM IST