छत्तीसगडमध्ये 50 हून अधिक जनावरं दगावली; गोठ्यात चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप
हेमाबंद गावात पाणी आणि चाऱ्या अभावी या जनावरांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

Published : August 24, 2026 at 6:56 PM IST
बेमेतरा : छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यातील दाढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 हून अधिक जनावरं दगावली आहेत. येथील हेमाबंद गावात पाणी आणि चाऱ्या अभावी या जनावरांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. इतकंच नाही तर, ज्या ठिकाणी ही जनावरं ठेवण्यात आली होती, तेथील अनेक जनावरांची प्रकृती गंभीर आहे. जनावरांच्या मृत्यूची बातमी पसरताच संपूर्ण परिसरात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. संतप्त ग्रामस्थ आणि प्राणी संरक्षण संघटनांसह हिंदू कार्यकर्ते आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. हिंदू संघटनांनी या घटनेसाठी स्थानिक पंचायत प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाला जबाबदार धरलं आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल : दरम्यान, दाढी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमाबंद येथील रहिवासी दिलीप राय हे गावकऱ्यांची जनावरं आपल्या खाजगी गोठ्यात ठेवतात. त्यांच्या देखभालीसाठी ते गावकऱ्यांकडून प्रत्येक जनावरामागे 1200 रुपये घेतात. मात्र, अस्वच्छता आणि आरोग्याच्या अभावामुळं या गोठ्यात जनावरं दगावली. गावकऱ्यांच्या मते, गोशाळेतील दृश्य भयानक होतं. कित्येक दिवसांपासून जनावरांना चारा दिला गेला नाही. तसंच जनावरांना पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नव्हतं. अनेक गायी चिखलात चारा आणि पाण्याअभावी दगावल्या. तसंच इतर जनावरं इतकी अशक्त आहेत की, ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीत.
गोरक्षकांची कारवाईची मागणी : घटनास्थळी दाखल झालेल्या गोरक्षकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. गोरक्षक आदेश सोनी, हरीश चौहान, उमेश बिसेन, मनीष शुक्ला, रोमन पांडे आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याची तसंच जनावरांसाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली.
"हेमाबंद गाव गोहत्या केंद्र बनलं आहे. दिलीप राय नावाचा एक माणूस पैशांसाठी जनावरं एका खोलीत कोंडून ठेवतो. जनावरांना चाऱ्याची आणि पाण्याची गरज नसते, असं त्याचं मत आहे, त्यामुळं तो त्यांना पाणी आणि चारा न देता एका चिखलमय खोलीत कोंडून ठेवतो. अशा मारेकऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे." - हरीश चौहान, गोरक्षक
"या गोहत्याकांडाला जबाबदार कोण आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 50 हून अधिक गुरांचे मृतदेह अजूनही तिथंच पडून आहेत, ज्यांना गिधाडे आणि कुत्रे फाडून खात आहेत. कोंबड्या आणि बकऱ्यांनासुद्धा इतक्या क्रूरतेनं वागवलं जात नाही. पण या वेळच्या गोहत्याकांडाला जबाबदार कोण? जर छत्तीसगडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, तर येत्या काही दिवसांत अशी महाभयंकर आपत्ती येईल, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल." - आदेश सोनी, गोरक्षक
डॉक्टरांचं एक विशेष पथक घटनास्थळी दाखल : याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, पशुवैद्यकीय डॉक्टरांचं एक विशेष पथक तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी वाचलेल्या आजारी जनावरांवर तत्काळ उपचार सुरू केले. मृत जनावरांचा पंचनामा करण्यात आला असून त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. करेसरा येथील गोरक्षक हरीश कुमार चौहान यांच्या तक्रारीच्या आधारे, दादरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी दिलीप राय याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 325 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 च्या कलम 11 (1) (अ) आणि 11 (1) (ज) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
"माहिती मिळाल्यानंतर आमचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांना काही जनावरं उभी असलेली तर काही अशक्त आढळली. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. गोठ्याच्या मालकानं आम्हाला याबद्दल माहिती दिली. मात्र, ते पैशांसाठी जनावरं गोठ्यात ठेवतात, याची आम्हाला आधी कल्पना नव्हती. आम्ही याबद्दल आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आहे. दिलेल्या कोणत्याही सूचनांनुसार आम्ही कारवाई करू." - कर्मचारी, पशुसंवर्धन विभाग
हेही वाचा :

