ETV Bharat / bharat

'बांगलादेशी घुसखोरांसाठी ममता बॅनर्जींनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा' : नितीन नबीन यांचा हल्लाबोल

बांगलादेशी घुसखोरांसाठी ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असा हल्लाबोल नितीन नबीन यांनी केला. त्यांनी शिक्षक भरती आणि इतर घोटाळ्यावरुन टीका केली.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 8, 2026 at 11:20 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चांगलच राजकारण रंगलं आहे. NRC प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे पश्चिम बंगालमधील तब्बल 90 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी दररोज भाजपा आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत आहेत. मात्र भाजपावर हल्लाबोल करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी जोरदार पलटवार केला. ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या वतीनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

एनआरसी बाबत ममता बॅनर्जी यांची याचिका : ममता बॅनर्जी यांनी NRC बाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीसाठी त्या स्वतः न्यायालयात उपस्थित होत्या. न्यायालयाच्या परवानगीनं त्यांनी आपला युक्तिवाद केला. याच पार्श्वभूमीवर नितीन नबीन यांनी ममता यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "ममता बॅनर्जी या बांगलादेशी घुसखोरांसाठी सर्वोच्च न्यायालयात गेल्या. या राज्यातील माता आणि भगिनींवर जेव्हा अत्याचार झाले, तेव्हा त्यांना न्याय मिळवून देण्यात त्या पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत."

पश्चिम बंगाल सध्या संकटाच्या छायेत : भाजपानं अलीपूरद्वार जिल्ह्यातील फलाकाटाच्या सोनापूर इथं निवडणूक सभा आयोजित केली. या सभेला संबोधित करताना, नितीन नबीन यांनी ममता यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला, "आपल्या पश्चिम बंगालला सध्या संकटाचं ग्रहण आहे. कोणताही विकास होत नसून राज्य पिछाडीवर गेलं आहे. या सरकारला सत्तेवरून खाली खेचणं अत्यावश्यक आहे. त्या 'मा, माटी, मानुष'बद्दल बोलत असल्या, तरी प्रत्यक्षात इथं काय घडत आहे हे प्रत्येकाला दिसत आहे. संदेशखाली आणि कामदुनीमध्ये काय घडलं, याचे आपण सर्व साक्षीदार आहोत."

बांगलादेशी घुसखोरांनी राज्यात केली घुसखोरी : "बांगलादेशी घुसखोरांनी राज्यात घुसखोरी केली आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांचे हक्क हिरावून घेतले आहेत. ते हक्क बांगलादेशातून आलेल्या या घुसखोरांच्या हाती सोपवले आहेत. नरेंद्र मोदी सरकार या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी कटिबद्ध आहे. या परिसरातील नागरिकांना कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतर करण्यास भाग पाडलं जात आहे. येथील मजुरांना अत्यंत तुटपुंजी मजुरी मिळते. येथील सरकार गाढ झोपेत आहे. ते स्थानिक लोकांना राज्याबाहेर जाऊन काम करण्यास सांगते. त्याचवेळी बांगलादेशातून आलेल्या लोकांना मात्र इथंच आश्रय देते," असा हल्लाबोल नितीन नबीन यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये गुंडाचं राज्य : नितीन नबीन यांनी तृणमूल काँग्रेसवर बंगालमध्ये 'टायकोंडेरोगा' अर्थात गुंडांचं राज्य चालवत असल्याचा आरोप केला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "जर भाजपा सत्तेवर आला, तर कोणत्याही गुन्हेगाराला, समाजकंटकाला सोडलं जाणार नाही. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सहारा आणि नर्मदा घोटाळ्यांसह विविध भ्रष्टाचार प्रकरणांबाबत गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतील अनियमिततांबाबतही त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की , "सहारा, नर्मदा, शिक्षक भरती आणि नगरपालिकांमधील नियुक्त्यांशी संबंधित सर्व घोटाळे याच ठिकाणी घडले आहेत. हा सर्व भ्रष्टाचार केवळ याच राज्यापुरता मर्यादित आहे. 'माता'चा पुतण्या कमिशन लाटतो. जर भाजपानं सरकार स्थापन केलं, तर त्या पुतण्याला तुरुंगाची हवा खावी लागेल. हे रोखण्याची ताकद कोणामध्येही नसेल. चहा मळ्यांमधील कामगारांची स्थिती अत्यंत बिकट आहे. 'माता' सरकारनं चहा कामगारांशी अत्यंत वाईट वागणूक दिली आहे. 'ममता दीदी'च्या प्रशासनानं त्यांचं आयुष्य उध्वस्त करून टाकलं आहे. मी येथील लोकांना हे सांगण्यासाठी आलो आहे की, इतर राज्यांमध्ये चहा मळ्यांमधील समुदायांच्या उत्थानासाठी आम्ही जे काही उपक्रम राबवत आहोत, तेच आम्ही या राज्यातही तंतोतंत अंमलात आणू. आम्ही 'आयुष्मान योजना' लागू करू."

हेही वाचा :

  1. ममता बॅनर्जी यांचं निवडणूक आयोगाला पत्र, मतदार याद्यांमध्ये भाजपा 'घुसखोरी' करत असल्याचा आरोप
  2. खराब हवामानाचा फटका! ममता बॅनर्जींचं विमान 1 तास 20 मिनिटं हवेत घिरट्या घालत होतं
  3. ममता बॅनर्जींनी निवडणूक आयुक्तांना लिहिलं पत्र; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशावर व्यक्त केलं आश्चर्य!