हुंड्यासाठी छळाला कंटाळून नवविवाहितेची कर्नाटकात आत्महत्या; घाबरलेल्या पतीनं नागपूरमध्ये दिला जीव, सासूचाही आत्महत्येचा प्रयत्न
हुंड्याच्या छळाला कंटाळून नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप; पत्नीच्या मृत्यूनंतर नागपूरमध्ये पतीनेही आत्महत्या केली.

Published : December 27, 2025 at 4:36 PM IST
बंगळूर : नवविवाहित गणवीच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण लागलं आहे. गणवीच्या मृत्यूनंतर, महाराष्ट्रातील नागपूर येथे गेलेला तिचा पती सूरजनेही आत्महत्या केली आहे. सूरजने नागपूरमध्ये आत्महत्या केली, तर त्याची आई जयंतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे गणवीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गणवी आणि सूरज यांचा विवाह २९ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला होता. दहा दिवसांपूर्वी हनिमूनसाठी श्रीलंकेला गेलेलं हे जोडपं मतभेदांमुळे आपला दौरा अर्धवट सोडून रविवारी घरी परतलं होतं, असं कुटुंबीयांनी सांगितलं. त्यानंतर, घरी झालेल्या भांडणानंतर गणवीला तिच्या पालकांनी माहेरी परत आणलं.
नंतर, बुधवारी (२४ डिसेंबर) दुपारी घरी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या गणवीला तिच्या पालकांनी वाचवलं आणि राममूर्तीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी गणवीचा मेंदू निष्क्रिय झाल्याचं सांगितलं होतं. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या गणवीचा गुरुवारी रात्री उपचारांदरम्यान मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.
गणवीच्या पालकांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली राममूर्तीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर, सूरज, त्याची आई जयंती आणि सूरजचा भाऊ संजय नागपूरला गेले होते. जयंती आणि सूरजने नागपुरात राहात असलेल्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला. सूरजचा मृत्यू झाला, तर त्याची आई जयंती नागपूरमधील एका रुग्णालयात उपचार घेत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी सूरज नागपूरमधील रॉयल व्हिलामध्ये थांबला होता. त्यानं आत्महत्या केली. त्याच्या आईनंही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु तिला वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुनेनं आत्महत्या केल्यानंतर आणि तिच्या पालकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे दोघेही घाबरले होते. म्हणूनच ते नागपूरला आले आणि तिथे थांबले होते," असं नागपूरमधील सोनेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन मगर यांनी सांगितलं.
टीप - आत्महत्या हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).
हेही वाचा...

