'व्हेनेझुएलासारखं उद्या भारतासोबतही घडू शकतं'- पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईवरून सावधानतेचा इशारा दिला आहे. जाणून घ्या, सविस्तर बातमी.

By IANS
Published : January 6, 2026 at 7:31 PM IST
|Updated : January 6, 2026 at 8:00 PM IST
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेकडून भारतात व्हेनेझुएलासारखी कारवाई होऊ शकते, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएलाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांविरुद्ध केलेल्या कारवाईसारखीच कारवाई भारतातही केली जाईल का, असा प्रश्न विचारला आहे. एवढचं राहीलं आहे, असे अमेरिकेच्या बदलत्या धोरणाबाबत म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, " व्हेनेझुएलासारखं भारतात होईल का? मिस्टर ट्रम्प हे आपल्या पंतप्रधानांचं अपहरण करतील का?" काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचं वक्तव्य केलं होतं.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस यांना त्यांच्या घरातून अटक केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्क वाढविण्याची धमकी दिली आहे. त्याचा संदर्भ घेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "५० टक्के आयातशुल्क असेल तर व्यापार करणं सोपे नसते. त्यामुळे अमेरिकेत निर्यात करणं हे भारतासाठी कठीण झालं आहे. थेट बंदी घालता येत नसल्यानं आयात शुल्काचा वापर करून भारताबरोबरील व्यापार अमेरिकेकडून रोखण्यात आला आहे. भारताला हे सहन करावं लागणार आहे. यापूर्वी निर्यातीमधून भारतीय लोकांना मिळणारा फायदा पुन्हा मिळणार नाही. आपल्याला पर्यायी बाजारपेठ शोधावी लागणार आहे. त्यादिशेनं यापूर्वीच पावले उचलण्यात आली आहेत".
धोकादायक परिस्थितीकडे जात आहोत- "व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना पकडण्याची अमेरिकेची कारवाई ही अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे. उद्या भारतासह इतर कोणत्याही देशासोबत असे घडू शकते", असा त्यांनी इशारा दिला. पुढे ते म्हणाले, "एका निवडून आलेल्या नेत्याचे अपहरण करण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही. व्हेनेझुएलामध्ये जे काही घडले ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेच्या विरोधात आहे. उद्या हे भारतासोबतही घडू शकते. जर तुम्ही एका देशाला आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आपली मनमानी करण्याची परवानगी दिली, तर मला वाटते की आपण एका अत्यंत धोकादायक परिस्थितीकडे जात आहोत," असे ते म्हणाले.
भारताची ठोस भूमिका नाही- "भारतानं अमेरिकेच्या कारवाईवर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही", अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पुढे ते म्हणाले, " व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावर काय योग्य आहे, काय नैतिकदृष्ट्या बरोबर आहे, याबद्दल भारतानं काहीही भूमिका घेतली नाही. रशिया आणि चीननं भूमिका घेतली आहे. त्यांनी अमेरिकेच्या कृतीवर टीका केली आहे. पण, पंतप्रधान मोदींना काय योग्य आणि काय अयोग्य आहे, यापेक्षा स्वतःच्या प्रतिमेची अधिक चिंता आहे. युक्रेन युद्धातही असेच घडले. आपण कोणतीही बाजू घेतली नाही. इस्रायल-हमास प्रकरणात कोणतीही भूमिका घेतली नव्हती. अगदी गाझामध्ये राहणाऱ्या लोकांविरुद्ध नरसंहाराचे स्पष्ट प्रकरण असतानाही शांत राहिलो. कारण नेतन्याहू हे पंतप्रधान मोदींचे वैयक्तिक मित्र आहेत."
- ट्रम्प यांनी भारताला काय इशारा दिला? " ते व्यापार करतात. आम्ही त्यांच्यावर त्वरित आयात शुल्क लादू शकतो. हे त्यांच्यासाठी वाईट असेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतेच वक्तव्य केलं आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी हे चांगले व्यक्ती असल्याचही त्यांनी म्हटलं. मी आनंदी नाही, हे त्यांना माहित आहे. त्यामुळे मला आनंदी करणं हे महत्त्वाचं आहे".
मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा केला दावा- पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १९ डिसेंबरनंतर देशात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर भारताचा पंतप्रधान बदलला जाणार आहे, तसेच तो पंतप्रधान मराठी माणूस असेल, असं म्हटलं होतं. बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील एपस्टीनचे पंतप्रधान मोदींशी नक्की नाते काय? असा सवालदेखील त्यांनी केल्यानं देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
हेही वाचा-

