ETV Bharat / bharat

शाळेत जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास; बिहारमधील नालंदामध्ये 50 विद्यार्थ्यांना करावा लागतो बोटीचा वापर!

शिक्षणाचे सरकारी दावे आणि वास्तव यांच्यातील अंतर नालंदा जिल्ह्यातील गिरियाक ब्लॉकमधील साकुचिडीह गावात स्पष्टपणे दिसून येते.

Children Take Turns Rowing A Boat To Ferry 50 Students To School Every Day In Bihar's Nalanda
शाळेत जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास; बिहारमधील नालंदामध्ये 50 विद्यार्थ्यांना करावा लागतो बोटीचा वापर! (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 9:03 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

नालंदा : "जर आम्ही रस्त्यानं गेलो तर आपल्याला 10 किलोमीटर प्रवास करावा लागेल. सकाळी 6 वाजता निघालो तर 12:30 वाजतील. त्यामुळं आम्हाला बोटीनं शाळेत यावं लागतं," असं सुधा कुमारी या विद्यार्थिनीनं सांगितलं. तर आणखी एका विद्यार्थिनी करीना कुमारी हिनं सांगितलं की, "अभ्यासात काहीच अडचण नाही, आम्हाला फक्त नाव चालवायची आहे. आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. आम्हाला आमचा जीव धोक्यात घालू नये म्हणून पूल लवकरात लवकर बांधावा अशी आमची मागणी आहे." दरम्यान, या त्या मुली आहेत, ज्यांना दररोज नदी ओलांडण्यासाठी आणि इतर 50 मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. दरम्यान, पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यामुळं त्यांना आपल्या अभ्यासाला ब्रेक द्यावा लागतो.

फक्त पुस्तकांचं ओझं खांद्यावर घेत नाहीत तर : शिक्षणाचे सरकारी दावे आणि वास्तव यांच्यातील अंतर नालंदा जिल्ह्यातील गिरियाक ब्लॉकमधील साकुचिडीह गावात स्पष्टपणे दिसून येते. येथील मुलं केवळ पुस्तकांचं ओझं खांद्यावर घेत नाहीत तर त्यांना बोट चालवण्याची असहाय्यता देखील सहन करावी लागते.

गावकरीही बोटीनं बाजारात जातात : जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाजीपूर पंचायतीतील साकुचिडीह गाव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेलं आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी बोटीनं वाहणारी नदी ओलांडावी लागते आणि गावकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी बाजारात आणि रुग्णालयातही जावं लागतं.

96.84 मीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार : निवडणूक जाहीरनाम्यात हा पूल बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तरीही, परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. मुख्यमंत्री ग्रामीण पूल योजनेअंतर्गत साकुचिडिह आणि सकुचीसराय दरम्यान सकरी नदीवर 96.84 मीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र, काम अद्याप सुरू झालेले नाही. पूल बांधण्याचा खर्च अंदाजे 6.20 कोटी असल्याचा अंदाज आहे.

शाळेत जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास; बिहारमधील नालंदामध्ये 50 विद्यार्थ्यांना करावा लागतो बोटीचा वापर! (ETV Bharat)

शालेय वयाची मुलं बोटी चालवतात : दोन्ही गावांची लोकसंख्या प्रत्येकी एक हजार आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी पूल नाही, योग्य बोट सेवा नाही आणि प्रशिक्षित बोटीवाले नाहीत. नदी ओलांडण्यासाठी फक्त एकच बोट आहे, जी बोटीवाले चालवत नाहीत तर गावातील मुलं चालवतात. बोटी चालवणे हे त्यांचं काम नाही, तर त्यांची मजबुरी आहे.

पायाभरणी झाल्यापासून एकही अधिकारी दिसला नाही : या पुलाचे बांधकाम जुलै 2025 मध्ये सुरू होणार होतं. पायाभरणी झाल्यापासून सात महिने उलटले आहेत, परंतु एकही वीट रचलेली नाही. पायाभरणी झाल्यापासून कंत्राटदार किंवा कोणत्याही विभागातील अधिकारी याठिकाणी दिसले नाहीत, असे येथील ग्रामीण महिला सांगतात.

"गावात बाजार किंवा दुकान नाही. लहान थाळी खरेदी करण्यासाठीही नदी ओलांडून सरायमध्ये जावं लागतं. सर्वजण मतं मागतात, पण कोणीही पूल बांधत नाही." - दौलती देवी, ग्रामीण महिला

दुसऱ्या गावाला जाण्यासाठी 10 किलोमीटर चालावं लागतं : सकरी नदी गाजीपूर पंचायतीला दोन भागात विभागते. साकुचिडीह गावात पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. हायस्कूल आणि प्लस टूसाठी मुलांना नदी ओलांडून साकुचिसराईला जावं लागतं. जेव्हा नदीमध्ये जास्त पाणी असते किंवा बोट उपलब्ध नसते, तेव्हा गावकरी आणि मुलांना फक्त एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी गोवर्धन बिघा किंवा मानपूर पुलावरून 10 किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो. हे टाळण्यासाठी, मुले स्वतःच्या बोट चालवून शाळेत जातात.

नववीच्या मुली बोट चालवतात : आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रशासनानं नदी ओलांडण्यासाठी कोणत्याही सरकारी बोटी किंवा नाविकांची सोय केलेली नाही. गावकऱ्यांनी देणग्या गोळा करून एक कमकुवत बोट तयार केली आहे. जेव्हा कोणी नाविक उपलब्ध नसतो, तेव्हा करीना कुमारी आणि सुधा कुमारी सारख्या नववीच्या मुली स्वतः बोट चालवतात आणि इतर 50 मुलांना घेऊन नदी पार करतात.

"पावसाळ्यात, जेव्हा नदीत खूप पाणी असते, तेव्हा गावातील काही तज्ज्ञ नाविक जे पोहू शकतात ते त्यांच्यासोबत येतात, अन्यथा आम्हाला आमचे शिक्षण सोडावं लागतं." सुधा कुमारी, विद्यार्थिनी

पूल लवकर बांधला पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची विनंती : एप्रिलमध्ये नवीन शालेय सत्र सुरू होत आहे. म्हणून, येथील सर्व विद्यार्थ्यांची सरकार आणि प्रशासनाकडे एकच मागणी आहे की, भविष्यातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी आरामदायी प्रवास करता यावा म्हणून लवकरात लवकर पूल बांधला पाहिजे.

शाळेत 13-14 गावांमधून विद्यार्थी येतात : सकुचीसराय येथील अपग्रेडेड माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षक धर्मेंद्र कुमार सांगतात की, त्यांच्या शाळेत 13-14 गावांमधून विद्यार्थी येतात. यापैकी 40-50 मुले (त्यापैकी 30 मुली) साकुचिडिहची आहेत. ते बोटीनं येतात.

"हवामान आता ठीक आहे, पण पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. तरीही, अभ्यास करण्यास उत्सुक असलेली मुलं इथं येतात, त्यांचा जीव धोक्यात घालून. कधीकधी, त्यांचा तोल जाण्याची भीती असते." - धर्मेंद्र कुमार, विज्ञान शिक्षक

पूल बांधण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही : दोन गावांमधील पुलाच्या बांधकामात होणाऱ्या विलंबाबद्दल "ईटीव्ही भारत"च्या प्रतिनिधींनी ग्रामीण बांधकाम विभागाच्या (राजगीर) कार्यकारी अभियंता मुनिता कुमारी यांच्याशी संवाद साधला, असता त्यांनी सांगितलं की, त्यांना परवानगी अद्याप मिळालेली नाही.

"साकुचिडीह जवळील सकरी नदीवरील पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, डीपीआर पुनर्तपासणीसाठी मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही, म्हणूनच काम सुरू झालेले नाही. आम्हाला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल अशी आशा आहे." - मुनिता कुमारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण बांधकाम विभाग

साकुचिडीह गाव अनेक प्रश्न उपस्थित करते : दरम्यान, भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 80 वर्षे झाली आहेत. या काळात प्रत्येक शहर प्रगतीच्या मार्गावर असेल, असं गृहीत धरलं जाऊ शकतं. पण खरोखरच ते घडत आहे का? साकुचिडीह गाव अनेक प्रश्न उपस्थित करते. आजही बिहारमध्ये असे अनेक भाग आहेत जिथं विकास संथ गतीनं सुरू आहे. प्रत्येक गावात शाळा आहे, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ना रस्ते आहेत ना पूल.

हेही वाचा :

  1. मरिन ड्राईव्हनंतर बारामती पोलिसांकडूनही एफआयआर नाही; रोहित पवार म्हणाले,'पोलिसांचे चेहरे पाहूनही दबाव जाणवतो'
  2. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज तुलना वादग्रस्त; इतिहासाच्या मांडणीवरून विधानसभेत खळबळ
  3. फळबाग कशी जोपासायची? कीटकनाशकांच्या फवारणीनं मधमाशांचा मृत्यू; डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात