मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघात, कारची ट्रकला जोरदार धडक, 4 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील उमरिया इथं एका भीषण रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Published : July 9, 2026 at 2:01 PM IST
उमरिया : मध्य प्रदेशातील उमरिया इथं एका भीषण रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिव्हिल लाइन्स चौकीजवळ राष्ट्रीय महामार्ग 43 वर घडला. भरधाव वेगानं येणाऱ्या एर्टिगा कारची समोरील ट्रकला जोरदार धडक झाली. दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला या अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली होती, परंतु नंतर त्यांनी सांगितलं की, 22 वर्षीय खुशबू सीपीआरनंतर शुद्धीवर आली आणि तिला तातडीनं जबलपूरला हलवण्यात आलं.
कारची ट्रकला जोरदार धडक : अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कारतील कुटुंब अनुपपूर जिल्ह्यातील होतं आणि ते चित्रकूटला जात होतं. भारौलाजवळील सिद्धा बाबा परिसरात, भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ती एका ट्रकला धडकली, ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 वर्षीय खुशबू हिला सीपीआर दिल्यानंतर ती शुद्धीवर आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच कार चालक ददन याचीही प्रकृती गंभीर आहे.
कारचं मोठं नुकसान : अपघात इतका भीषण होता की, कारचं मोठं नुकसान झालं आहे. मृतांमध्ये सरपंच कुलपत सिंह, त्यांची हेड कॉन्स्टेबल पत्नी सविता सिंह मार्को, प्रियांका सिंह आणि रुद्र प्रताप यांचा समावेश आहे. अपघातातून बचावलेल्या खुशबू हिला तिचं कुटुंबीय परीक्षेसाठी चित्रकूटला घेऊन जात होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच, कोतवाली पोलीस आणि 108 रुग्णवाहिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर पथकानं गाडीत अडकलेलं मृतदेह बाहेर काढले.
दोघे गंभीर अवस्थेत : अतिरिक्त पोलीस अधीक्षक आलोक शर्मा म्हणाले, "राष्ट्रीय महामार्ग 43 वरील सिद्ध बाबा परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि मागून एका ट्रकला धडक दिली. कारमध्ये सहा जण होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व अनुपपूर जिल्ह्यातील लीला गावचे रहिवासी होते आणि परीक्षेसाठी चित्रकूटला जात होते."
हेही वाचा :

