ETV Bharat / bharat

विषारी दारूमुळे बिहारमध्ये पित्याचा मृत्यू; मुलानं गमाविली दृष्टी

बिहारमधील समस्तीपूरमध्ये विषारी दारूमुळे ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मुलानं दृष्टी गमाविली आहे.

Bihar Hooch Tragedy
प्रतिकात्मक (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 8, 2026 at 2:24 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मस्तीपूर (पाटणा) : बिहारमध्ये दारूबंदी असताना समस्तीपूर जिल्ह्यात नवीन वर्ष सुरू होताच विषारी दारूमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. मुसरीघरारी पोलीस स्टेशन हद्दीतील बखरी बुजुर्ग गावात बालेश्वर साह (६०) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मुलाला अंधत्व आलं आहे.

मृताचा मुलगा बबलू कुमार साह (३०) म्हणाला, "१ जानेवारी रोजी गावात दारू उपलब्ध होती. दारू विक्रेता शेजारचा असल्यानं मला चांगली दारू मिळेल, असे वाटले. मी तीन बाटल्या घेतल्या. त्यामधील एक बाटली माझ्या वडिलांना दिली. दारू पिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. जवळच्याच एका डॉक्टरकडे गेल्यानंतरही त्याची तब्येत सुधारली नाही. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी तब्येतही बिघडली". बबलू कुमार साहनं पुढे स्पष्ट केलं की, "दिसत नसल्यानं मी वडिलांच्या शरीरालाही पाहू शकलो नाही. माझी तब्येत पुन्हा बिघडली. माझे कुटुंब पाटण्याला गेल्यानंतर मी दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं".

बबलू कुमार साहची पत्नी म्हणाली, "माझ्या पतीनं दुकानात गुपचूप दारू प्यायली. मला माहिती असते तर मी त्याला दारू पिऊ दिली नसती. अरविंद कुमार उघडपणे दारू विकतो. येथे सर्वत्र दारू उपलब्ध आहे. त्याला थांबवणारं कोणीही नाही." पीडितच्या कुटुंबानं मुसळधारी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. दारू तस्करी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.

२०१६ पासून बिहारमध्ये दारूबंदी- घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं आहे. शास्त्रीयदृष्ट्या पुरावे गोळा केले जात असून पोलिसांनी निष्पक्ष तपासाचं आश्वासन दिलं आहे. "प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा केले जात आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल", असे पोलीस अधिकारी संजय कुमार पांडे यांनी सांगितलं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं. २०१६ पासून बिहारमध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, असे असूनही बिहारमध्ये बनावट दारू आणि दारू तस्करीमुळे होणारे मृत्यू सुरूच आहेत.

  • बिहारमधील सिवान आणि सारण ऑक्टोबर २०२४ मध्ये विषारी दारू पिण्यामुळे किमान ३५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती.

हेही वाचा-