वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विध्यापीठात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीनं वापर आणि जनसंपर्काची भूमिका’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं शानदार उद्घाटन समारंभ कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांच्या उपस्थितीत झालं. राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त आयोजित या चर्चासत्रानं तंत्रज्ञान आणि जनसंपर्काच्या संगमाला एक नवं व्यासपीठ प्रदान केलं.

कृत्रिम बुद्धिमत्ता : विकसित भारताचा आधारस्तंभ
कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, “नव्या युगात तंत्रज्ञानासोबत पुढे जाणं क्रमप्राप्त आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एक महत्त्वपूर्ण शक्ती ठरेल. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर विवेकपूर्ण, सावध आणि जबाबदारीनं करण आवश्यक आहे.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये नवचेतना निर्माण झाली.
चर्चासत्राचा भव्य शुभारंभ
22 आणि 23 एप्रिल रोजी गालिब सभागृहात आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन दीपप्रज्वलन आणि कुलगीतानं झालं. यावेळी पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) पश्चिमचे उपाध्यक्ष एस.पी. सिंह, अमरावती-नागपूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिल आलूरकर, मानविकी व सामाजिक विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. फरहद मलिक, जनसंपर्क विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे, कुलसचिव प्रा. आनंद पाटील या परिषेदेला उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामर्थ्य आणि सावधगिरी
एस.पी. सिंह यांनी कविता आणि शायरीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचं जनसंपर्क आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व सर्जनशीलतेनं मांडलं. अनिल आलूरकर यांनी तंत्रज्ञानाच्या जोखीमांवर प्रकाश टाकताना, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग देश आणि समाजहितासाठी झाला पाहिजे,” असं ठामपणं सांगितलं. प्रा. फरहद मलिक यांनी भारतीय ज्ञानपरंपरेला कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडून जागतिक स्तरावर प्रसार करण्याचं आवाहन केलं. प्रा. कृपाशंकर चौबे यांनी चॅट जीपीटीसारख्या साधनांद्वारे समस्यानिवारण आणि जीवनातील बदलांचा दाखला दिला.
पीआरएसआयचा परिचय आणि योगदान
महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे यांनी पीआरएसआयच्या देशभरातील 25 शाखा आणि जनसंपर्क क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. “राष्ट्रीय जनसंपर्क दिन दरवर्षी 21 एप्रिल रोजी नव्या विषयासह साजरा केला जातो,” असं त्यांनी नमूद केलं.
चर्चासत्रातील वैचारिक मंथन
उद्घाटनानंतर महादेवी वर्मा सभागृहात ‘शिक्षणाच्या विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता’ या विषयावर शैक्षणिक सत्र पार पडलं. विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. गोपाल कृष्ण ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अंजनी कुमार राय, डॉ. शिशुपाल कुमार आणि डॉ. हेमलता गोडबोले यांनी आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात ‘मीडिया आणि जनसंपर्कात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका’ यावर विदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी विचारमंथन केलं. सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील सत्रात प्रो. जनार्दन कुमार तिवारी, डॉ. शिशुपाल कुमार आणि डॉ. गिरीश चंद्र पांडे यांनी मार्गदर्शन केलं.
जनसंपर्कातील भविष्यातील दिशा
चर्चासत्राचा समारोप 23 एप्रिल रोजी दुपारी 4:40 वाजता कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे आणि प्रा. कृपाशंकर चौबे यांची विशेष उपस्थिती असेल.
संशोधक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती
मोठ्या या चर्चासत्राला विदर्भातील माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता, शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं संचालन डॉ. राजेश लेहकपुरे यांनी तर आभार प्रदर्शन रवी गीते यांनी केलं. सुतमाळ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला. या चर्चासत्रानं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार वापरासह जनसंपर्क आणि शिक्षण क्षेत्रातील नव्या शक्यतांचे दरवाजे उघडले आहे. विकसित भारताच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकताना, या वैचारिक मंथनानं सर्वांना कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत अधिक जागृक, सजक राहण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
हे वाचलंत का :