पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. वारंवार हा प्रश्न का विचारला जातोय, हेच कळत नाही. प्रसारमाध्यमांना वाटत आहे की, दोन्ही पक्ष एकत्र यावं," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न : दरम्यान, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Al) वापर' या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, "काही चॅनल मी अज्ञात वासात गेलो असल्याचं सांगत आहे. अज्ञात वासात जायचं प्रश्न नाही. आम्ही आमचा पक्ष राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. विधानसभा निवडणुकीत जे अनुभव आले. त्यातून पक्ष सुधारण्याचं काम आम्ही करत आहोत. लग्नकार्य तसंच पाऊस कमी झाल्यावर आम्ही राज्यभर फिरून पक्ष वाढवण्याचं काम करू, " असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
...तर चांगली गोष्ट : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत जी काही चर्चा सुरू आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, "त्यांनाही प्रसार माध्यमांनी एकत्र केलं आहे. ते दोघे एकत्र येतील का? याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. तसंच जे कोणीसोबत येतील, त्यांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे. हा शिवसेनेचा निर्णय असून त्यांनी जर म्हटलं तर ते त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करतील. तसंच राज ठाकरे प्रभावी नेते असून त्यांच्या येण्यानं जर आमची ताकद वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे, " असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन : उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात होत आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, "उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे. मागच्या वर्षी अहमदनगर येथे वर्धापन दिन साजरा करण्यात आलं होता. तेव्हा प्रचंड पाऊस अनुभवायला पाहायला मिळाला होता. यावर्षी पाऊसाचा अंदाज पाहून पुण्यात वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे."
भाजपाचे नेते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते : याचबरोबर, "आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहोत," असं जयंत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सांगितलं. तसंच, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात लिहिलेल्या लेखाबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, "राहुल गांधींनी जो लेख लिहिला आहे, त्याला निवडणूक आयोगानं उत्तर देणं अपेक्षित आहे. पण भाजपाच त्यांना उत्तर देत आहे. भाजपावर कोणतेही आरोप नसून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. भाजपाचे नेते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते व्हायला लागले आहेत," असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
हेही वाचा :