मुंबई: 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' आणि 'महाराष्ट्र दिन' हे दोन्ही दिवस १ मे रोजी साजरा केले जातात. या दोन्ही दिवस साजरे करण्यामागचा इतिहास वेगळा आहे. अर्थाअर्थी हे दोन्ही दिवस एकत्र साजरा करण्यामागे परस्परसंगती नाही.
कामगार दिनाचा इतिहास (Labour Day History): १ मे हा दिवस संपूर्ण जगात 'कामगार दिन' म्हणून साजरा होतो. त्याचा इतिहास १९ व्या शतकापासून सुरु होते. १८८६ साली कामगारांनी कामाच्या वेळेवरून आंदोलन केल्यावर या दिवसाची सुरुवात झाली. त्या काळात मजुरांना प्रत्येकी १५ तास काम करावं लागत होतं. १८८६ मध्ये शिकागोच्या मार्केटमध्ये दंगल झाली आणि यानंतर १५ तासांच्या कामाच्या शिफ्टमध्ये एका कामगारांचा मृत्यू झाला. या दिवशी लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. यानंतर कामाचे तास ८ तास असावे आणि आठवड्यातून एक सुट्टी द्यावी, अशी मागणी या लोकांनी केली होती. या संपादरम्यान कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांसह अनेक कामगारांचा मृत्यू झाला. यानंतर १ मे १८८९ रोजी एक बैठक झाली आणि हा दिवस 'कामगार दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतात 'कामगार दिन' कधीपासून सुरू झाला? : १ मे १८८९ रोजी अमेरिकेनं 'कामगार दिन' साजरा करण्याच्या प्रस्तावाच्या ३४ वर्षांनंतर भारतात 'कामगार दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. देशात 'कामगार दिन' सर्वप्रथम चेन्नई येथे १९२३ मध्ये सुरू झाला. श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या अध्यक्षतेखाली 'कामगार दिन' साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशातील इतर अनेक कामगार संघटनांनीही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतात दरवर्षी १ मे रोजी 'कामगार दिन' साजरा केला जातो, या दिवशी अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी देखील दिली जाते. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी महत्त्वाचा आहे.
'महाराष्ट्र दिना'चा इतिहास (Maharashtra Day History): भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती. स्वातंत्र्यानंतर शेकडो छोटी-छोटी राज्ये एकत्र करत राज्य व्यवस्था स्थापन करण्यात आली. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायद्याने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या सीमा निश्चित केल्या गेल्या. परंतु अनेक भाषा बोलणाऱ्या 'बॉम्बे' राज्याच्या सीमा विसंगत होत्या. या राज्यात मराठी आणि गुजराती या दोन भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. या मतभेदांमुळं 'बॉम्बे' राज्याचं दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यासाठी चळवळ झाली. परिणामी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही दोन राज्ये मुंबई पुनर्रचना कायदा १९६० अंतर्गत अस्तित्वात आली. हा कायदा १ मे १९६० रोजी लागू झाला. तेव्हापासून हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो.
मुंबईसाठी दोन राज्यांमध्ये संघर्ष : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये मुंबई (तत्कालीन बॉम्बे) शहरावरून मोठा वाद झाला होता. 'बॉम्बे'ला महाराष्ट्रात सामील करावं, असं मराठी लोकांचं मत होतं. कारण इथली बहुसंख्य लोक मराठीत संवाद साधत. १९५६ मध्ये 'बॉम्बे' या द्विभाषिक राज्यातून वेगळं मराठी भाषक राज्य निर्माण करण्याची मागणी सुरु झाली. त्याच वर्षी गुजरात भाषकांसाठीच्या वेगळ्या राज्यासाठी 'महागुजरात चळवळ' सुरु झाली होती. त्यांनीही मुंबईला गुजरातमध्ये सामिल करण्याची मागणी केली. त्यासाठी प्रभावशाली आणि शक्तिशाली गुजराती उद्योगपतींनी मुंबईच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. मोरारजी देसाई यांनी मुंबईचा एकतर गुजरातमध्ये समावेश करावा किंवा मुंबई केंद्रशासित प्रदेश बनवावं, अशी भूमिका घेतली. १०७ हुतात्म्यांच्या रक्तसिंचनाने १ मे १९६० रोजी 'सयुक्त महाराष्ट्र' अस्तित्वात आला. सयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी 'मंगलकलश' आणला.
टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.
हेही वाचा -