पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूरमध्ये न्यायालयीन परिसरात वकिलानेच मारहाण केल्याची घटना घडली. तसंच, कोरटकरवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र केली जातेय. याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारण्यात आले. यावेळी, प्रशांत कोरटकरवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. तसंच, आम्ही कधीही प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर याचं समर्थन केलेलं नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.
ऑपरेशन टायगरबाबत काय म्हणाले उदय सामंत ? : पुण्यात आज महालक्ष्मी लॉन येथे शिवसेना पक्षाचा शहर आणि जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रवींद्र धंगेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री उदय सामंत यांना ऑपरेशन टायगर बाबत विचारलं असता, ते म्हणाले की, "रवींद्र धांगेकर यांच्यावर खूप मोठी जबाबदारी दिलीय. शरद सोनवणे हे सुद्धा आज आमचे सहयोगी सभासद आहेत. अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं यासाठी आमच्याकडं लोकं येत आहेत. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात, हे लोकांना कळलं आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो आहोत. पक्ष आमचा वाढला पाहिजे, बाकी पक्षांना दखल घ्यावी लागेल, इतकी आमची सभासद नोंदणी आहे".
मैत्रीत कोणीही विषाचा खडा टाकू शकत नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले, "मी दोन महिने सांगतोय, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कधीही एकमेकांचा विश्वासघात कधीच केला नाही. मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब यांच्या मैत्रीत कोणीही विषाचा खडा टाकू शकत नाही आणि त्यांची दोस्ती ही दुभंगु शकत नाही", असं उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच यावेळी उदय सामंत यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी आमचे सूत्र हे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते जे सांगतील तोच निर्णय फायनल असेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही विकृती : कॉमेडियन कुणाल कामरानं साधारणतः तीन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय भूकंपावर विडंम्बनात्मक गाणं सादर केलं होतं. या कुणाल कामराबाबतही उदय सामंत यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, "कुणाल कामरा यांना मी व्यवस्थित उत्तर देऊ शकतो, पण ताई इथं आहेत. त्यानं सुप्रीम कोर्टावर जी कविता केलीय, ती तुम्ही ऐकली तर तुम्ही तुमच्या पायाची चप्पल काढाल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही विकृती आहे", असं उदय सामंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा-