मुंबई : मुंबईला जसा सांस्कृतिक व स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे, तसाच मुंबईचा गुन्हेगारीचा देखील एक इतिहास आहे. तो इतिहास आजही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात काही कारणानं चर्चेला येत असतो. ज्याला एक नाव देण्यात आलं ते म्हणजे 'अंडरवर्ल्ड'. हा काळ होता जेव्हा मुंबईत अनेक छोट्या मोठ्या टोळ्या होत्या. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, करीम लाला, मन्या सुर्वे अशी अनेक नाव मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात आजही चर्चेत आहेत. या नावांवरून आजही राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही सर्व नावं आज पुन्हा एकदा एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं चर्चेला आली. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अंडरवर्ल्डमधील गुंड करीम लाला मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला आल्याची आठवण सांगितली.
बाळासाहेब व करीम लाला यांच्या भेटीची आठवण : निमित्त होतं मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचे वार्तांकन करणारे जेष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या 'मी पाहिलेला तीन दशकातील थरार' या पुस्तकाच्या प्रदर्शनाचं. या पुस्तक प्रकाशनाला पद्मश्री व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, संपादक व खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. याच कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब व करीम लाला यांच्या भेटीची आठवण सांगितली.
'क्राइम्स ऑफ इंडिया' : "तुमच्या काळात कोणत्या बातमीला कुठं स्थान द्यावं याची नैतिकता पाळली जात होती. आताचे पेपर म्हणजे 'क्राइम्स ऑफ इंडिया' आहेत. गुन्हेगारीचं एक वेगळं जग आहे. या पुस्तकात तुम्ही छोटा शकील आणि न्यायाधीशांचे संबंध लिहिले आहेत. पोलीस हे देखील एक शस्त्र आहे. राजकीय हाणामाऱ्या होत असतात. त्या झाल्याच पाहिजेत. हाणामाऱ्या म्हणजे दंगली नाही. टीका, प्रतिक्रिया झाल्याच पाहिजेत," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आताच्या पत्रकारितेवर नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण : "मला आठवतं, पूर्वी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धमक्या यायच्या. तुमचं आंदोलन बंद करा आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करा. अशा त्या धमक्या असायच्या. आता देखील पोलिसांचा वापर सुरू आहे. आता देखील नेत्यांचा, पत्रकारांचा आवाज दाबला जात आहे आणि आमच्या पक्षात प्रवेश करा, असं सांगितलं जात आहे. मी काहीकाळ या राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळं मला खात्री आहे की पोलिसांना फ्री हॅण्ड दिला तर ते चमत्कार करू शकतात. आजघडीला ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण दिलं जातं आहे. तुम्ही या पुस्तकात लिहिलं आहे अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, नेते, मंत्री, न्यायाधीश या गुंडांकडे मदत मागायला जायचे. पण मला आठवतं की, करीम लाला बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर आला होता. तो कशासाठी आला? त्यांच्यात काय बोलणं झालं? हे मला माहिती नाही. तेव्हा मी लहान होतो," अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. "आता पोलीस एन्काऊंटर करतात, पण तो खरा की खोटा? अक्षय शिंदे प्रकरणात काय झालं आपण पाहात आहोत. कारण ऑर्डर देणारे वेगळेच असतात. पोलिसांनी देखील आपल्या ब्रीद वाक्याचा मान राखावा," असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा - एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले "हिऱ्यापोटी गारगोटी..."