जून महिन्यामध्येच उजनी धरण 50 टक्के भरले, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
उजनी धरण 50 टक्के भरल्यानं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी लगबग सुरू केलीय.


Published : June 17, 2025 at 2:15 PM IST
सोलापूर- जिल्ह्याचं जीवनदायिनी असलेलं उजनी धरण हे जून महिन्यांमध्येच 50 टक्के भरल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या उद्योगासाठी तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातील पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे उजनी धरणात पाण्याचा वाढलेला साठा हा सोलापूरकरांसाठी फायदेशीर ठरतो. सोलापूर जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये उजनी धरणाचा मोठा वाटा असून, उजनी धरण जून महिन्यामध्ये 50 टक्के भरलंय. उजनी धरण 50 टक्के भरल्यानं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी लगबग सुरू केलीय.
उजनी धरणामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून आवक येण्यास सुरुवात : ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुखावह चित्र दिसून येत आहे. या वर्षी 18 एप्रिल 2025 रोजी उजनी धरण उणे पातळीमध्ये गेले होते. 14 मेपर्यंत उजनी धरणाची पाणी पातळी ही उणे 22.96 म्हणजे 23 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू झाला आणि उजनी धरणामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून आवक येण्यास सुरुवात झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून 27 मे रोजी उजनी धरण उपयुक्त पातळीमध्ये म्हणजे प्लसमध्ये आले होते.
उजनीची वाटचाल शतकाकडे सुरू राहणार : 27 मे ते आज 17 जून म्हणजे केवळ 20 ते 22 दिवसांत उजनी धरणाने दणदणीत अर्धशतक पूर्ण केले असून, आता उजनीची वाटचाल शतकाकडे सुरू राहणार आहे. 17 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजता उजनी धरणाचा पाणीसाठा 50.79 टक्के झाल्याने उजनी धरणाने जून महिन्यामध्येच नाबाद अर्धशतक गाठले असून, दौंडवरून येणारी आवक 14642 क्युसेक इतकी आहे. पावसाला अजून चार महिने असल्याने उजनी धरणाची वाटचाल आता शतकाकडे होऊ लागली आहे.
हेही वाचाः

