छत्रपती संभाजीनगर : राज्यात पाणी प्रश्न पेटला असून मुंबईनंतर आता उबाठा संभाजीनगर शहरात 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलन करणार आहे. एक महिना ही आंदोलन चालणार आहे, प्रत्येक वॉर्डांत वेगवेगळं अभियान राबवण्यात येणार आहे. नवीन जलवाहिनी कधी तयार होईल, या पेक्षा येणाऱ्या पाण्याचं नियोजन का नाही? त्यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. "मनपा आयुक्त आयपीएल सामने पाहण्यात व्यस्त आहेत, त्यांनी नियोजन केलं तर योग्य पाणी मिळू शकते. मनपानं पाण्याचं आश्वासन दिलं तर आंदोलन रद्द करू, मात्र पाणी द्या," असं आवाहन देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केलं.

पाण्याचं नियोजन नसल्यानं आंदोलन : ऐतिहासिक आणि आद्योगिक ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. शहराची गरज 240 एनएलडी इतकी आहे, तर जायकवाडी इथून मिळणारं पाणी जवळपास 140 एनएलडी इतकं आहे. असं असताना नागरिकांना कधी आठ तर कधी दहा दिवसाला पाणी मिळते. पाण्याचं नियोजन केल्यास एक दिवसाआड पाणी देणं शक्य असताना ते का होऊ शकत नाही, हा प्रश्न असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. त्यामुळे नवीन पाणी योजना कधी होणार, यापेक्षा आहे त्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाण्यासाठी उबाठा रस्त्यावर येणार : पाण्याच्या नियोजनासाठी उबाठा रस्त्यावर उतरणार आहे. एक दोन नाही तर एक महिना सलग आंदोलनाचं नियोजन केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. "18 एप्रिलपासून रोज वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे. सुरुवातीला शहरातील येणाऱ्या मार्गांवर हंडा तोरण उभारून पक्षातील नेते आंदोलन करतील. त्या नंतर प्रत्येक वॉर्डात जनजागृती मोहीम, हंडा मोर्चा, स्वाक्षरी मोहीम, सायकल आंदोलन, रिकाम्या हंड्यांचं, टाक्यांचं पूजन, महिला आघाडीतर्फे निवेदन, पाणी प्रश्नावर आधारित फोटो प्रदर्शन केलं जाईल. तर शेवटच्या दिवशी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलन सभा होईल," अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
पत्रकारांनी काड्या करणं सोडून द्यावं : उबाठा शिवसेना पक्षातील नेते एकत्रित येऊन आंदोलन करणार आहेत. मात्र पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी असलेल्या वादाबाबत विचारणा झाल्यावर, अंबादास दानवे चांगलेच संतप्त झाले. पत्रकारांनी काड्या करणं बंद करा, असं त्यांनी पत्रकारांना सुनावलं. "चंद्रकांत खैरे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणले, मात्र मी काहीही बोललो नाही. आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर पत्रकारांनी काड्या करू नका. आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी पत्रकारांना बोलावतो, बातमी लावायची तर लावा नाहीतर लाऊ नका," असं अंबादास दानवे म्हणाले.
पाण्याचं नियोजन करा : "मनपा आयुक्त पाण्याचं नियोजन करण्यापेक्षा क्रिकेट सामने पाहण्यात व्यस्त असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. शहरासाठी पाणी योजनेचं काम सुरू आहे. सत्तेत असलेले लोक उबाठा पक्षावर आरोप करतात, मात्र ज्या समांतर योजनेला अमेरिकेत पारितोषिक मिळाले, ती योजना भाजपानं बंद पाडण्यासाठी आंदोलन केलं. नव्यानं योजनेचं उद्घाटन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं. महिन्याला तीन किलोमीटर काम पूर्ण होणं गरजेचं होतं. त्यासाठी अनेक वेळा उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. शहरातील जाहीर सभेत त्यांनी जनतेची माफी मागितली. मात्र नंतर एकनाथ शिंदे आल्यानंतर काम पूर्ण झालं नाही," असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
हेही वाचा :