नांदेड : गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळं भारतानं सरकारनं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाया सुरू केल्या आहेत. तसंच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवून देण्यापासून ते थेट सिंधू जल करार रद्द करण्यापर्यंत असे अनेक निर्णय भारतानं दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात घेतले आहेत. दरम्यान, भारत सरकारनं सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा करार रद्द संशयास्पद असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज नांदेड येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रच वाचून दाखवलं : इंडस अर्थात सिंधू जल करार भारतानं रद्द केल्याचं जाहीर केलं, पण यासाठी ज्या सचिवाच्या सहीनं पत्र काढण्यात आलं आहे. त्यातील मुद्दा क्रमांक पाच हा संशयास्पद आहे. पाकिस्तान थेंब थेंब पाण्यासाठी तरसेल, हे भाजपचे फेक नरेटीव्ह असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात भारत सरकारनं जारी केलेलं पत्रच प्रकाश आंबेडकर यांनी वाचून दाखवलं. ते म्हणाले, "पत्रामध्ये पाचवा जो कॉलम आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे की, दी गव्हर्मेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाईड्स, दॅट इंड्स वॉटर ट्रीटी 1960 विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजेट इफेक्ट. हे पत्र 24 एप्रिलला लिहिलेलं आहे. पत्र लिहिणारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी देवाशिष मुखर्जी आहेत. त्यांनी हे पत्र सय्यद अली मूर्तझा (सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स, पाकिस्तान) यांना लिहिलेलं आहे."
बीजेपीच्या नॅरेटिव्हनं लिहिलेलं आहे, ते पूर्णपणे खोटं : पुढं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, "पत्राच्या पाचव्या कॉलममध्ये काय म्हटलेलं आहे की, अबेयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस्को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही, तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ, असा या अबेयन्स शब्दाचा अर्थ मी त्या ठिकाणी काढतो. त्याच्यामुळं पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे, थांबवणार आहोत असा कुठंही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. त्याच्यामुळं जे या सरकारनं म्हटलंय की आम्ही असताना फार मोठी कारवाई केली की, बूंद बूम के लिए पाकिस्तान तरसेगा, असं जे काही बीजेपीच्या नॅरेटिव्हनं लिहिलेलं आहे, ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या मुद्द्यावरती पहलगामच्याबाबतीत सिरीयस नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे. दोन्ही घटनांच्याबाबतीत ते सिरीयस नाहीत. एवढेच फक्त या असणारा पत्रातून आधोरेखित होते, अशी परिस्थिती आहे."
मनोबल वाढवण्यासाठी हुतात्मा स्मारकासमोर बसणार : "भारतीय लष्कर कारवाई करण्यासाठी सज्ज आहे, असं म्हणतंय. पण येथील पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही. त्यामुळं त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरीत पैसा नाही, असं त्यांना वाटत असेल तर दोन तारखेला आम्ही तिजोरीत डोनेट करायलाही तयार आहोत. याचबरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल. तसेच, हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही दोन तारखेला हुतात्मा स्मारकासमोर बसणार आहोत. याठिकाणी आम्ही पक्ष म्हणून बसणार नाही. इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, इतर पक्षाच्या नेत्यांनाही आम्ही विनंती करतोय की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं", असंही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
हेही वाचा-