मुंबई : विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाषण करताना राज्य सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकारचा प्रवास बाबरीकडून कबरीकडे होत आहे, या कबरीच्या नादात या सरकारची कधी कबर खणली जाईल, हे लक्षात येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसंच, राज्यात सरकार आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनागोंदी आहे. विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार असताना सरकार सुरळीत का चालत नाही? असा सवाल करत कोत्या मनोवृत्तीनं सरकार चालवलं जातंय. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढतंय, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
कायद्याचा धाक नसल्यामुळं या सर्व घटना घडतायेत : अंबादास दानवे म्हणाले, ""२०२४ मध्ये राज्यात ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे नोंद झाले. एकट्या अमरावती विभागात २०२४ मध्ये दंगलीचे ५६४ गुन्हे घडले. नागपूरमध्ये ८८ हत्या झाल्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या १६६ घटना घडल्या, पुण्यात ५०६ गुन्हे घडले. कायद्याचा धाक नसल्यामुळं या सर्व घटना घडतायेत. तसंच तुरुंगातील कैद्यांची क्षमता २७ हजार ११४ बंदी असताना ४३ हजार कैदी तुरुंगात ठेवलेत. राज्यात वर्षभरात जनतेची ५१ हजार कोटींची आर्थिक फसवणूक झाली. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेय. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारनं पाहिजे तसा प्रयत्न करण्याची गरज असून सायबर सेल अधिक प्रभावी होण्याची गरज आहे", असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. तसंच, "छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता" ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर करत राज्य सरकारच्या कारभारावर अंबादास दानवेंनी टीका केलीय.
...तर सर्व सामान्यांचे काय? : याचबरोबर, अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण हे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या डोळ्यात घातलेलं अंजन आहे. सैफ अली खानच्या आरोपीवर कारवाई होते, मंत्र्यांच्या मुलाचं विमान परत बोलावलं जातं, मात्र सुर्यवंशी प्रकरणात कारवाई का होत नाही, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. तसंच, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड होते तर सर्व सामान्यांचे काय होत असेल. मस्साजोग प्रकरणी अजून एक आरोपी फरार आहे. त्यामध्ये मंत्र्यांचे नाव आले मात्र त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हे दाखल करुन दबाव टाकायचा व पक्षात येण्यासाठी प्रवृत्त करायचे हा काय प्रकार आहे, असंही अंबादास दानवे यांनी सांगितलं. याशिवाय, सत्ताधारी राजकीय पक्ष यंत्रणा कशा पद्धतीनं वापरतात, याचं हे द्योतक असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय.
हेही वाचा :