अमरावती : गेल्या मंगळवारी (दि.२२) जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यातील सहा पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अमरावती, नागपूर, वरूड आणि अकोला येथील १२ रहिवाशी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीनगरहून ते कसेबसे जम्मूला पोहोचले आहेत. मात्र, आता परतीच्या प्रवासासाठी तिकीट प्रचंड महाग झाल्यामुळे घरी परतायचं कसं? असा प्रश्न त्यांना पडला असून या संकटात सरकारनं आम्हाला मदत करावी आणि आम्हाला घरी सुखरूप परतण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
१२ पर्यटक अडकलेत जम्मूत : अमरावती शहरातील श्रीकांत विचूरकर, ऐश्वर्या विंचूरकर, रियांश विंचूरकर, नागपूर येथील रामेश्वर आसरे, वनिता आसरे, शुभम आसरे, वैष्णवी आसरे, वरूड येथील मोहन मांडळे, मीना मांडळे आणि अकोला येथील रेखा आसरे या नातेवाईक असणाऱ्या दहा जणांसोबत अमरावतीचे आणखी दोघे, असे एकूण १२ जण गेल्या १७ एप्रिलला कटरा येथे पोहोचले होते. तिथून ते सर्वजण १८ एप्रिलला श्रीनगर गेले. तीन दिवस त्यांनी श्रीनगरसह सोनमर्गसह गुलमर्ग येथे पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर २३ एप्रिलला ते पहलगामला जाणार होते. मात्र एक दिवस आधीच त्यांना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते सर्वजण श्रीनगरला थांबले आणि काल (बुधवारी) श्रीनगरहून जम्मूला पोहोचले आहेत.
अनेक ठिकाणी कसून चौकशी : यासंदर्भातील माहिती वैष्णवी आसरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. तसे, "पहलगाम येथील घटनेमुळे आमच्यासह श्रीनगरला देशाच्या विविध भागातून आलेले पर्यटक घाबरले होते. बुधवारी रात्री आमच्यासह अनेकांनी श्रीनगरसोडून जम्मूकडे धाव घेतली. जम्मूकडे येताना बऱ्याच ठिकाणी रस्ता बंद होता. अनेक ठिकाणी कसून चौकशी सुरू असल्यामुळे आम्ही रात्री बऱ्याच उशिरा जम्मूला पोहोचलो", असं वैष्णवी आसरे यांनी सांगितले. दुसरीकडे, "आम्ही श्रीनगरहून जम्मूला निघालो असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फोन करून आमची चौकशी केली. जम्मूमध्ये वैष्णवदेवी मंदिर परिसरात कालिका धाम या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली", असे श्रीकांत विंचूरकर यांनी सांगितले.
सरकारनेच आम्हाला मदत करावी : याचबरोबर, पुढे श्रीकांत विंचूरकर यांनी म्हणाले की, "आम्ही जम्मूला सुखरूप पोहोचलो. याठिकाणी आमची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. आता घरी पोहोचण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्पेशल विमानाची व्यवस्था केल्याचे आम्ही ऐकलं आहे. मात्र, आम्हाला त्याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. रेल्वेचे तिकीट सध्या मिळत नाही. विमानाचे तिकीट खूप महाग झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारनेच आम्हाला आमच्या घरी पोहोचविण्यासाठी मदत करावी", अशी विनंती देखील श्रीकांत विंचूरकर यांनी केली आहे.
हेही वाचा :