कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Results 2025) मंगळवारी जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट असणाऱ्या या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. अनेकांना नापास झाल्यामुळं नैराश्येला सामोरे जावं लागलं, मात्र गेली तब्बल बारा वर्ष दहावी पास होण्यासाठी धडपडणाऱ्या कोल्हापुरातील भरत कांबळेनं मिळवलेलं यश नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असंच आहे.
"दहावी फेल" म्हणणाऱ्या लोकांना दिला सुखद धक्का : 2012 या वर्षी दहावी नापास झाल्यानंतर अनेकवेळा प्रयत्न केले, मात्र त्याला यश मिळालं नाही. यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल एक तपानंतर भरत दहावी पास झाला आणि त्याचा निकालावरच विश्वास बसला नाही. गेली 11 वर्ष "दहावी फेल" म्हणून चिडवणाऱ्या सर्वांनाच त्यांनी सुखद धक्का दिला. आता दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्याचा मानस भरत कांबळेचा आहे.
कसा होता भरत कांबळेचा संघर्षमय प्रवास? : आई-वडिलांचं छत्र हरपलेला भरत कांबळे कोल्हापुरातील दौलतनगर येथे राहतो. अनाथ असलेल्या भरतचा सांभाळ त्याच्या चुलता-चुलती आणि आजी-आजोबांनी केला. 2012 यावर्षी भरत राजारामपुरीतील आर. के. वालावलकर हायस्कूलमधून दहावीच्या परीक्षेला बसला होता. मात्र, या परीक्षेत त्याला यश मिळालं नाही, तो नापास झाला. यानंतर "दहावी फेल" असा शिक्का घेऊन तो गेली अकरा वर्ष दहावी पास होण्यासाठी अनेक प्रयत्न करत होता. मात्र, त्याला यश काही मिळालं नाही. सहा विषयातील इंग्रजी हा त्याचा नावडता विषय होता. 2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दहावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर सोडवला यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. उरलेले दोन विषय यंदा मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेत बसून त्यांनी सोडवले आणि तब्बल 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भरत कांबळे दहावी पास झाला. जेव्हा दहावीचा निकाल घोषित झाला तेव्हा भरतला विश्वासच बसला नाही. मात्र, त्याला सातत्यानं मार्गदर्शन करणाऱ्या विश्वजीत भोसले यांनी तू आता दहावी पास झाला आहेस, कॉलेजला जाण्याची तयारी कर असा फोन केल्यानंतर भरत आनंदीत झाला. "दहावी फेल" असा शिक्का घेऊन 11 वर्ष पास होण्यासाठी धडपडणाऱ्या भरतनं उच्च शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त केला.
'यांच्या' पाठबळानं शिक्षणाच्या प्रवाहात : भरत कांबळे दहावी नापास झाल्यानंतर मिळेल ती कामं करायचा, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मित्राच्या अंडा भुर्जीच्या गाडीवर त्यानं काम केलं. सहा महिन्यापूर्वीच त्याला चारचाकी वाहन चालकाचा परवाना मिळाला आहे. त्यामुळं आता तो खासगी वाहन चालक म्हणून काम करतो. त्यानं दहावीची परीक्षा दिली होती. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले आणि कोल्हापुरातील वाचन कट्टा संस्थेचे युवराज कदम यांच्या तो संपर्कात आल्यानंतर त्याला वाचनाची गोडी लागली. यातूनच त्यानं सातत्यानं प्रयत्न करत दहावीत यश मिळवलं. अकरा वर्ष केलेल्या प्रयत्नाला याच लोकांनी सहकार्य केल्याचं भरत कांबळेनं सांगितलं.
हेही वाचा -