मुंबई- राज ठाकरेंनी शुक्रवारी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत मनोमीलनाचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे त्यावर उद्धव ठाकरेंनीही काही अटी आणि शर्थींच्या आधारे राज ठाकरेंच्या मनसेबरोबर युती करण्याची तयारी दर्शवलीय. आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलंय. काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नकोत. त्यामुळे हे असे काटे मारत असतात. राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा, ताबडतोब काही क्षणांत उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसादसुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी होता. याच्यात अटी आणि शर्थी वगैरे आल्या कुठे, नाही आल्यात. कोणती अट आणि कोणती शर्थ, जर दोन प्रमुख नेते जे महाराष्ट्रात भाऊ आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होतेय. त्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूससुद्धा आहे. त्यात अट आणि शर्थ आहे कुठे, कोणतीच नाही, ही लोकभावना आहे. मी बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. महाराष्ट्र हितासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्यासाठी कोणतीही अटी किंवा शर्थी नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
त्यांनी भाजपाच्या पंगतीत बसू नये...: दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हिताच्या फॉर्मुल्यात भाजपा किंवा महाराष्ट्र द्रोह्यांच्या पंगतीत बसू नये. महाराष्ट्र हिताच्या जे आड येतील, त्यांना घरातही घेऊ नका, अशा लोकांची संगत नको. आम्ही मोरारजी देसाई किंवा नरेंद्र मोदी यांचे घरात फोटो लावतो का? कारण ही दोन्ही माणसं महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्रातील गावातील शेवटच्या माणसालाही वाटतंय की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे आणि याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मनसेकडून कोण काय म्हणतंय, याला मी उत्तर देणार नाही. जर राज ठाकरे बोलले तर आम्ही समजू, असं राऊत म्हणाले.
किंतु, परंतु कशाला... : महाराष्ट्र हितासाठी आणि मराठी माणसासाठी आपण पुढे पाऊल टाकले पाहिजे, पण आता हे दोन भाऊ एकत्र येऊ नये, असं काही लोकांना वाटत आहे. महाराष्ट्र हितासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येताना कशाला किंतु, परंतु हवेत. अटी-शर्थीवर वाद घालणे हे महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्थ्यावर पडेल. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी कोणतीही अट ठेवलेली नाही. फक्त महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत, त्यांच्याशी हातमिळवणी करायचे नाही, एवढेत ते म्हणालेत आणि यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच भूमिका मांडतील. दोन्ही बाजूंनी पाऊल पडले आहे ते कुठे कमी आहे का, पुढे सकारात्मक चर्चा होईल. जो निर्णय घ्यायचा आहे, तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेऊ शकतात. तो तिसरा कोणीही नाही, यावर कोणीही तिसरी व्यक्ती मत व्यक्त करू शकत नाही. काही गरज नाही, यावर मत व्यक्त करण्याची असं राऊत म्हणालेत.
तुम्हाला काही अडचण आहे का? : राज-उद्धव एकत्र यावेत म्हणून संजय राऊत शिवाजी पार्क येथे राज ठाकरेंच्या कॅफेत चर्चेसाठी जाणार का? असा प्रश्न राऊतांना विचारला असता, राज ठाकरे यांच्यासोबत माझे जुने संबंध आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलेले आहे आणि दोन ठाकरे नेते हे शेवटी भाऊच आहेत. ते एकत्र यावेत ही सर्वाची इच्छा आहे. पण त्यांनी एकत्र यावे हे तुम्हाला नको आहे का? तुम्हाला काही अडचण आहे का? तुमचा त्यामुळे टीआरपी कमी होणार का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.
शिंदे गटाला यावर बोलण्याची गरज काय? : राज-उद्धव एकत्र येणार का? यावर एकनाथ शिंदेंना विचारले असता, एकनाथ शिंदे संतापले, असं राऊतांना विचारले असता, शिंदेचा संताप होऊ शकतो. देवेंद्र फडणवीसांचा पण आतल्या आत संताप होत असेल. भाजपाचा आनंद किती आणि कसा असतो हे आम्हाला माहीत आहे. राज ठाकरेंच्या घरी जाऊन कुणी काड्या केल्या हेसुद्धा माहीत आहे. राज-उद्धव यांच्यावर बोलण्याची शिंदे गटाची गरज काय आहे. तुम्ही आता तुमचे बघा... तुमचे अमित शाह हे पक्षप्रमुख आहेत, त्यांचे तुम्ही ऐका, अशी टिका संजय राऊतांनी शिंदे गटावर केलीय.
हेही वाचा -