मुंबई : गेल्या मंगळवारी (दि.२२) जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यातील सहा पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानच्या विरोधात आणि दहशतवाद्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळत आहे. त्यामुळे आता दहशतवादी आणि पाकिस्तानला जशास तसे, उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यांना सोडणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीला शिवसेना ठाकरे गट गैरहजर राहणार आहे.
काही अपरिहार्य परिस्थितीमुळे : सर्वपक्षीय बैठकीबद्दल आपण गैरहजर राहणार आहोत, याबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांना कळवले आहे. "आजच्या सर्वपक्षीय बैठकीबद्दल तुमचा निरोप मिळाला, पण तुम्हाला कळविण्यास खेद होत आहे की, काही अपरिहार्य परिस्थितीमुळे मी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. परंतु शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला विश्वास देतो की, या अशा वेळी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यावर, या भ्याड हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी भारत सरकार जो कारवाईबाबत निर्णय घेईल, त्याला आमचा ठामपणे समर्थन आणि पाठिंबा असेल", असं खासदार अरविंद सांवत यांनी म्हटले आहे.
आम्ही सरकारसोबत : दरम्यान, दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये भ्याड हल्ला केला आहे. त्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, मात्र या हल्ला झाल्यानंतर याच्यात कोणतेही राजकारण न आणता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. या दहशतवादी हल्ल्याचा आणि दहशतवादाचा सामना केला पाहिजे, यासाठी आम्ही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि सरकारसोबत आहोत, हा देश एक आहे हे दाखवून देण्याची वेळ आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे. त्या बैठकीत सरकार जो कारवाईबाबत निर्णय घेईल, त्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :