शिर्डी (अहिल्यानगर) : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीत येतात. भाविकांची श्रद्धा आणि भक्ती जशी आहे, तशीच त्यांची सुरक्षितता राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शिर्डीतील पोलीस प्रशासनातील त्रिमूर्ती, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आणि वाहतूक शाखा निरीक्षक महेश येसेकर या तिघांनी मिळून शिर्डीतील कायदा आणि सुव्यवस्थेला नवे बळ दिले आहे.
रणजित गलांडे यांची कामगिरी : गेल्या काही महिन्यांपूर्वी शिर्डीत साई संस्थानमधील दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन हादरले आहे. यानंतर शिर्डी पोलीस ठाण्याचा भार रणजित गलांडे यांच्याकडं सोपवण्यात आला. त्यांनी पदभार घेतल्यापासून गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसला आहे. शहरात घडणाऱ्या लहान-मोठ्या गुन्ह्यांत त्यांनी अनेक गुन्हेगारांना जिल्हाबंदी केली. गाव देवाचं आहे आणि देव सर्वांचा आहे. त्यामुळं गाव शांत असायलाच हवं या भूमिकेतून गलांडे काम करत असून त्यांची ही शिस्तप्रिय आणि धारदार कार्यपद्धती नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहे.
चोरट्यांपासून भाविक झाले मुक्त : साई मंदिरात भक्त दर्शन घेतल्यानंतर परिसरात पर्स आणि मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. हे लक्षात घेऊन साई मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस निरीक्षक रोहिदास माळी यांनी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांचे सिव्हिल पथक तयार केले. या पथकाचे एकमेव उद्दिष्ट पॉकेटमार चोरांना पकडणं हे होतं. गेल्या वर्षभरात या पथकानं अनेक चोर पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हे दाखल केले आहेत. विशेष बाब म्हणजे हे चोर भाविकांसारखे कपडे घालून मंदिर परिसरात भाविक बनून भाविकांच्या खिशावर डल्ला मारायचे. बहुतांश चोर हे बाहेरील राज्यातील असत. माळी यांच्या रणनीतीमुळं आज मंदिर परिसर चोरट्यांपासून बऱ्यापैकी मुक्त झाला आहे.
बेजबाबदार वाहनचालक झाले सावध : शिर्डीत भाविकांची गर्दी वाढली की वाहतुकीचा खोळंबा हा नेहमीचाच मुद्दा होता. पण आता या अनागोंदीला आळा घातला आहे वाहतूक शाखा निरीक्षक महेश येसेकर यांनी. पदभार स्वीकारताच येसेकर यांनी अवैध वाहतूक, नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली. जामर कारवाईमुळं बेजबाबदार वाहनचालक आता सावध झाले आहेत. त्यामुळं शिर्डीतील वाहतूक आता पूर्वीपेक्षा बरीच सुरळीत झाली आहे.
समस्या नियंत्रणात आल्या : साई भक्तांच्या सुरक्षतेचा वारंवार निर्माण होणारा प्रश्न तसेच कायम होणारी वाहतूक कोंडी, शिर्डीतील गुन्हेगारी या सर्व समस्यामुळं साईभक्त आणि ग्रामस्थ कायम नाखुश असतात. परंतु, या तिन्ही सकारात्मक अधिकाऱ्यांनी साईभक्त आणि ग्रामस्थ यांना केंद्रस्थानी ठेवल्यामुळं सर्व समस्या नियंत्रणात आल्याचं साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सांगितलं.
हेही वाचा -