ठाणे- शहापूर तालुक्यातील भातसा नदीत तीन जणींचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये माय-लेकासह भाचीचा मृत्यू झाला. यामध्ये १५ वर्षीय मुलाचादेखील समावेश आहे.
जीवरक्षक पथकाच्या सदस्यांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली. ही घटना शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफे येथील भातसा नदीत घडली आहे. वनिता सुदर्शन शेळके (वय ३३ रा. वाफे) लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय ५० रा. चेरपोली) धीरज दत्तात्रय पाटील (वय १५ वर्ष रा . चेरपोली ) असे नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृत लक्ष्मी आणि वनिता या दोन महिला कपडे धुण्यासाठी आज दुपारच्या सुमारास वाफे येथील भातसा नदीवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत १५ वर्षाचा धिरज आईसोबत गेला होता. उन्हाचा तडाखा असल्यानं धीरज अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडत होता. त्याची आई वाचविण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरली. पण तीही नदीत बुडू लागली. समोर दोघेही बुडत असल्याचं पाहून महिलेची भाचीदेखील नदीच्या पात्रात उतरली. तिनं दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिघींचाही नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला.
सर्वांचं मन हेलावून गेलं- मृतामध्ये आई, मुलगा आणि भाची असे हे तिन्ही एकाच कुटुंबातील आहेत. तिघांच्या मृत्यूनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन जण नदीच्या पात्रात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि जीवरक्षक टीमच्या सदस्यांना मिळाली. त्यानंतर पोलीस आणि जीवरक्षक टीमचे सदस्य तत्काळी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शोध घेत तिघांना नदीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या माय-लेक आणि भाची यांची प्राणज्योत मावळली होती. या घटनेनं सर्वांचं मन हेलावून गेलं आहे. तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहेत.