शिर्डी (अहिल्यानगर)- साईबाबांच्या मूळ (चर्म) पादुका शिर्डीबाहेर (Saibaba Paduka Darshan News) दर्शनासाठी नेण्याच्या साईबाबा संस्थानच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी विरोध केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत दिवाणी याचिका दाखल केली. या याचिकेवर २७ मार्च रोजी सुनावणी झाली. न्यायालयानं साईबाबा संस्थानला ७ एप्रिलपर्यंत लेखी म्हणणं ( शपथपत्र ) सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चामडे जसेजसे जुने होते, तसेतसे खराब होते. त्याचप्रमाणं जुन्या चामड्याच्या वस्तू वारंवार हाताळल्या तर त्या खराब होत जातात. त्यात साईंच्या पादुका हा पवित्र असल्यानं त्या शंभरहून अधिक वर्षे झाल्यानं या पादुका बाहेर नेऊच नये. मात्र, त्याबाबत काही निर्णय घ्यावयाचा असेल तर भारतीय पुरातत्व विभागाची आणि उच्च न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच म्हणणं आहे. त्याबाबत त्यांनी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली.
पादुकांचं नुकसान झालं तर जबाबदार कोण?- साईबाबांनी वापरलेली प्रत्येक वस्तु संग्रहालयात विशिष्ट तापमानात, विशिष्ट प्रक्रिया करून दीर्घकाळ टिकू शकतात. वारंवार हाताळणी झाल्यास त्या वस्तूंचं आयुष्य संपण्याची शक्यता आहे. भविष्यात साईबाबांचे भक्त साईबाबांनी हाताळलेल्या वस्तू पाहण्यासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे. साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझा विरोध नाही. पण, साईबाबांनी वापरलेली एकही वस्तू शिर्डीबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जर प्रवासात या पादुकांचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते काळे यांनी उपस्थित केला.
साईभक्तांना सबुरीचा मार्ग अवलंबावा लागणार- साई संस्थाननं साईबाबांनी वापरलेल्या मुळ चर्म पादुका दक्षिण भारतात नेण्याचा दौरा आखलाय. साईबाबा संस्थाननं शिर्डीपासून तामिळनाडूपर्यंत मुळ चर्म पादुका घेऊन जाण्याचा भरगच्च कार्यक्रम तयार केला. येत्या १० एप्रिलपासून तब्बल २७७६ किलोमीटरचा साईंच्या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार आहे. मात्र, साईबाबांच्या मूळ चर्म पादुका शिर्डीबाहेर जाऊ नये, यासाठी दाखल केलेल्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, याकडं जगभरातील साईभक्तांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ एप्रिलला होणार आहे. हा निर्णय होईपर्यंत साईभक्तांना सबुरीचा मार्ग अवलंबावा लागणार आहे.
हेही वाचा-