मुंबई : कित्येक वर्षांपासून मच्छीमार बांधवांची मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची मागणी होती. मात्र यावर कोणताही ठोस निर्णय होत नव्हता. याबाबत मच्छीमार बांधव आणि संघटना वारंवार पाठपुरावा करत सरकारसोबत बैठक घेतल्या, चर्चा केली. यानंतर अखेर मच्छीमार बांधवांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले. कारण, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अनेक वर्षाच्या प्रयत्नांना यश : मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याच्या निर्णयानंतर मच्छीमार बांधवातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आज अनेक मच्छीमार बांधव आणि संघटना मंत्रालयात आले होते. मच्छिमार बांधवांनी या निर्णयानंतर मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दरम्यान, "आम्ही कित्येक वर्षांपासून मच्छिमार बांधवांना शेतीचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करत होतो. परंतु आम्हाला यश मिळत नव्हते. मात्र आता या महायुती सरकारने आमच्या मागणीचा विचार करून आमच्यासारख्या गरीब मच्छिमार बांधवांना शेतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे. आता आम्हालाही अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे. आमच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे", अशा बोलक्या प्रतिक्रिया मच्छीमार भगिनींनी दिल्या आहेत.
समुद्र ही आमची शेती : "आम्ही कित्येक वर्षापासून मच्छ व्यवसाय करतोय, हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. परंतु या व्यवसायाला कोणतीही सवलती नव्हती, सुविधा नव्हत्या. त्यामुळे फक्त मत्स्य व्यवसाय आमच्याकडून केला जात असे. परंतु आता शासन आमच्या पाठीशी उभा राहिले आहे. राज्यातील चार लाखापेक्षा अधिक मच्छिमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता आम्हालाही कृषी क्षेत्राचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला बँकेतून कर्ज मिळणार, अनेक योजनाचा लाभ मिळणार, तसेच मुख्य म्हणजे यातून रोजगार निर्मिती होणार आहे. आमचा कित्येक वर्षापासूनची ही मागणी होती. अखेर या मागणीला यश आले. आता या निर्णयामुळे आमचे आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे. त्यामुळे आज खरोखरच खूप आनंद होतोय", असेही मच्छिमार महिलांनी सांगितले.
हेही वाचा :