मुंबई : मुंबई-पुणे रेल्वे मार्ग अधिक जलद आणि अडथळाविरहित करण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सुमारे 9 हजार कोटीहुन अधिक रुपये खर्चाच्या प्रकल्पांतर्गत कर्जत ते तळेगावदरम्यान चौथी आणि पाचवी नवीन मार्गिका उभारण्यात येणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी 20 ते 30 मिनिटांनी घटणार असून, घाटमाथ्यावरून थेट रेल्वे मार्ग खुला होणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गात प्रस्तावित असलेला 30 किलोमीटर लांबीचा रेल्वे बोगदा हा देशातील सर्वाधिक लांब बोगदा ठरणार आहे. प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार असून, तो सध्या रेल्वे बोर्डाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
कर्जत ते तळेगावदरम्यान नवीन मार्गिका : मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत ते तळेगावदरम्यान चौथी-पाचवी नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्प सुमारे 60 किलोमीटर असणार आहे. यामध्ये 43 किलोमीटर लांबीचे बोगदे प्रस्तावित आहेत. विशेष बाब म्हणजे, यातील एक बोगदा तब्बल 30 किलोमीटर लांबीचा असून तो देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सदर प्रकल्पाच्या संपूर्ण कामासाठी साडेनऊ हजार कोटींचा अंदाजीत खर्च येणार असून, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे सुमारे सहा वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून, हा अंतिम आराखडा रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे.
वेळ आणि खर्च वाचणार : रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लोणावळा घाटात रेल्वे गाड्यांना चढाईदरम्यान अतिरिक्त इंजिन म्हणजेच जोड इंजिन लावावे लागते. गाडीला जादाचे इंजिन लावणे आणि ते पुन्हा काढणे यासाठी वीस मिनिटांचा कालावधी लागतो. यामुळे प्रवासात विलंब तर होतोच, शिवाय इंधन आणि संसाधनांचाही अतिरिक्त खर्च होतो. नव्या मार्गिकांमुळे या अडचणी दूर होणार असून, गाड्या थेट घाट पार करू शकतील. परिणामी वेळेची मोठी बचत होणार आहे.
मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार : या नव्या मार्गामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास 20 ते 30 मिनिटांनी जलद होणार आहे. एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि भविष्यातील सेमी-हायस्पीड ट्रेन सेवांसाठीही हा मार्ग उपयुक्त ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. सोबतच, मालवाहतुकीसाठीही ही मार्गिका फायदेशीर ठरणार असून लॉजिस्टिक खर्चात घट, आणि उद्योग साखळीला गती मिळणार आहे.
आराखडा मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे : रेल्वेने या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून अंतिम आराखडा तयार केला असून, रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. याच अनुषंगाने कर्जत ते खोरावडी दरम्यानही पाचवी व सहावी मार्गिका प्रस्तावित असून, 61 किमी लांबीच्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, अंतिम आराखडा अद्याप रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आलेला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. कर्जत ते खोरावडी मार्गिकेमुळे मुंबई ते नाशिक असा प्रवास देखील अधिक वेगवान होणार असल्याचा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.