पुणे : पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडलाय. रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळं भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीह सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise death case) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या विरोधात आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर विविध पक्ष तसंच संघटनेच्या वतीनं आक्रमक आंदोलन करत कारवाईची मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिलेत तर या प्रकरणी आता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले जिल्हाधिकारी? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, "जर खरंच असा प्रकार घडला असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. जोपर्यंत निकष समोर येत नाही. तोपर्यंत काहीही म्हणणं चुकीचं आहे. जी काही चौकशी करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक गोष्ट तपासली जाणार असून काही चुकीचं असल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे. येत्या दोन दिवसात समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानुसार कारवाई केली जाणार आहे."
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया : "या घटनेकडं सरकार गांभीर्यानं बघत असून योग्य ती कारवाई होईल. मुजोरी करणे ही मुघलशाही आहे. नेमकी काय चूक झाली? याची तपासणी सरकार करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचा उपचार घेणं अधिकार आहे. यासाठी जबाबदार व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. कुणालाही या प्रकरणात माफ करणार नाही. कडक कारवाई करणार," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : या दुर्दैवी घटनेची गांभीर्यानं दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागानं तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसंच "रुग्णालय प्रशासनानं माध्यमांसमोर त्यांचं म्हणणं मांडलं असलं, तरी शासन या प्रकरणातील सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावं," असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.
हेही वाचा -