अहिल्यानगर : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरलं आहे. आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्यानं आता प्रहारचे कार्यकर्ते राज्यभर आक्रमक होताना दिसत आहे. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये देखील प्रहारच्या वतीनं सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आलं.
प्रहारच्या वतीनं अनोखं आंदोलन : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू हे उपोषणास बसले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसील कार्यालयावर रेडा आणि पोतराज यांना सोबत घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच सरकारनं बच्चू कडू यांच्या मागण्या तातडीनं मान्य कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेसोबत तालुक्यातील अन्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
मागण्या मान्या न झाल्यास आंदोलन तीव्र करणार : "मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचे काम करत आहे. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या, अपंगांच्या विविध मागण्याकरिता अन्नत्याग उपोषणाला बसले आहे. त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा यापुढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार, असा इशारा प्रहारचे तालुकाध्यक्ष शिदोरे यांनी दिला.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला प्रतिसाद : माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. यासह बच्चू कडू यांना राजकीय वर्तुळातून बच्चू कडू यांच्या मागण्यांचं समर्थन होत आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. सध्या बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. आरोग्य विभागाच्या पथकानं बच्चू कडू यांची तपासणी केली असता बच्चू कडू यांचं वजन 4 किलोंनी कमी झालं आहे.
शेवगाव तहसीलदारांना दिलं निवेदन : आंदोलकांनी शेवगावच्या संत गाडगेबाबा चौकातून आंदोलनाला सुरुवात केली. यानंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेडा आणि पोतराज यांच्यासोबत शेवगाव तहसील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारलं.
हेही वाचा :
- "चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं...", संजय शिरसाटांनी आपल्या खास शैलीत दिल्या आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- साताऱ्यात महिला वकिलाच्या घरात चोरी, रोख रकमेसह 'इतक्या' तोळ्याचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
- विमान अपघातातील अपर्णा महाडिक यांचं कोल्हापूरशी होतं खास नातं; 'ही' इच्छा अधुरीच राहिली!