मुंबई : जम्मू काश्मीर इथल्या पहलगाममधील पर्यटनस्थळावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघंही पुण्यातील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अतुल मोने आणि दिलीप दिसले या दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू -
- दिलीप देसले - पनवेल
- संतोष जगदाळे - पुणे
- कौस्तुभ गणवोटे - पुणे
- हेमंत जोशी - डोंबिवली, ठाणे
- संजय लेले - डोंबिवली, ठाणे
- अतुल मोने - डोंबिवली, ठाणे
दोघं ठार झालेले पुण्यातील पर्यटक : दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तब्बल 27 पर्यटकांना मृत्यू झाला आहे. या पर्यटकांमध्ये दोन जण हे पुण्यातील पर्यटक होते. पुण्यातील दिलीप दिसले आणि अतुल मोने या दोघांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
संतोष आणि कौस्तुभ यांना लागल्या गोळ्या : पुण्यातील पर्यटक जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. पुण्यातील आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे हे पर्यटक पहलगाममध्ये होते. यावेळी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांनाही गोळी लागली आहे. हे कुटुंब मुळचे बारामती तालुक्यातील असून सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदान्त नगरीजवळ राहात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

डोंबिवलीमधील तिघांचा मृत्यू : पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पूर्व पश्चिम शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी ,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही काश्मिरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, त्यावेळी त्यामध्ये तिघेही जखमी झाले होते. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.
पनवेलमधील दिलीप देसलेंचा मृत्यू : दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल सेक्टर १२ येथील दिलीप देसले यांचा मृत्यू झालाय, तर कामोठे येथील सुबोध पाटील आणि माणिक पाटील हे पती-पत्नी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमरनाथ यात्रेसाठी पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सद्वारे ३९ पर्यटक रवाना झाले होते. २१ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान निसर्ग ट्रॅव्हल्स आयोजित अमरनाथ यात्रा निघाली होती. या यात्रेत पनवेल येथील ३९ पर्यटक सहभागी झाले होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल माध्यमांवर दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशी मी देवाला प्रार्थना करतो, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात : आम्ही जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिद्री, ज्यांच्या अखत्यारीत पहलगाम येते, त्यांनाही फोन करून चौकशी केली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दिलीप दिसले आणि अतुल मोने यांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक पनवेल येथील माणिक पटेल आहेत. एस. भालचंद्र राव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवानं, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा :
- पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून निषेध, अमित शाह श्रीनगरच्या दौऱ्यावर जाणार - PAHALGAM TERROR ATTACK NEWS
- जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला; गोळीबारात एकाचा मृत्यू, 12 जण जखमी - TERRORIST ATTACK IN PAHALGAM