मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमानं पर्यटकांसाठी केली होती, आणखी 232 प्रवाशांसाठी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीनं काश्मिरला जाण्यास सांगितलं होतं. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एकूणच स्थितीचा आढावा घेतला. आणखी विमानं करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असं त्यांनी सांगितलं. गिरीश महाजन यांनी सैन्याच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.
प्रवाशांना घेवून आणखी विमान येणार : काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या विनंतीवर काम केलं जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. शुक्रवारी काश्मिरातून येणार्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर अजून विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
पर्यटकांच्या सेवेसाठी एसटीची शिवनेरी धावली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते. त्यांना विशेष विमानानं सुखरूपपणे मुंबईत आणून मुंबईहुन पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचे नियोजन एसटीनं केलंय. पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पर्यटकांचं विशेष विमान मुंबई विमानतळावर (टर्मिनल २) येथे दाखल झालं. मुंबईहुन त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
हेही वाचा -
- महाराष्ट्रातील पर्यटक 12 दिवसांसाठी गेले काश्मीरला; हल्ल्यानंतर दोनच दिवसात परतले घरी, पर्यटकांची काश्मीरकडं पाठ
- काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना अजित पवारांनी दिला धीर; व्हिडिओ कॉलद्वारे पर्यटकांशी साधला संवाद
- ''त्यांनी माझ्या समोरच बाबांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या; २० वर्षाच्या मुलावर वडिलांचा मृत्यू पाहण्याची वेळ