अमरावती: माणसाच्या आयुष्यात विशिष्ट कर्तव्य आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी चार आश्रम व्यवस्था हिंदू धर्मात आहेत. ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अशी ही आश्रम व्यवस्था आहे. वानप्रस्थ ही व्यवस्था माणसांप्रमाणे अनेक वन्यप्राण्यांमध्येही आढळते. कळपात राहणारा रानगवा हा एका विशिष्टवेळी कळपाबाहेर निघून जंगलात एकांतवासात जगतो. सातपुडा पर्वतानं व्यापलेल्या मेळघाटच्या जंगलात खंडू नदी वाहते. त्या भागातील जंगल परिसर कळपातून बाहेर पडलेल्या अशाच रानगव्यांचं वास्तवाचं ठिकाण असल्याचा निष्कर्ष समोर आलाय. वृद्ध रानगव्यांचं निवासस्थान असणाऱ्या या जंगल परिसरासंदर्भात ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट वाचा.
या जंगलात रानगव्यांचा एकांतवास : गायी, म्हशींप्रमाणे शिंग असणाऱ्या कुळातील एक हजार किलो वजनाचा मोठा तृणभक्ष प्राणी अशी रानगव्याची ओळख आहे. मेळघाटच्या जंगलात सर्वच भागात रानगव्यांचा कळप आढळतो. चिखलदरा तालुक्यात जारीदा वन परिक्षेत्रांर्गत 14 हजार 191.63 वर्ग किलोमिटर जंगलाच्या कोअर झोनमध्ये रानगवा एकटाच भटकताना दिसतो. या जंगल परिसरात रानगव्यांचा कळप आढळत नाही. जंगलाचा हा भाग म्हणजे रानगव्याच्या एकांतवासाचं ठिकाण आहे. असं अनेक दिवसांच्या निरीक्षणातून आढळतंय, असं जारीदा वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत काळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

रानगव्यांचं वानप्रस्थ स्थळ : माणसाच्या आयुष्यातील तिसऱ्या वानप्रस्थ म्हणजे आश्रमाच्या टप्प्यात माणसानं सांसारिक जीवनातून माघार घेऊन जंगलात किंव्हा एकांतवासात ध्यान योग करावा, असं सुचवण्यात आलंय. रानगवा हा प्राणीदेखील आयुष्यभर कळपात राहतो. वृद्धापकाळापत किंवा आजारी पडल्यावर तो आपल्या कळपाचं संरक्षण करण्यास सक्षम राहत नाही. त्यावेळी त्याला कळपाबाहेर काढलं जातं. कळपातून बाहेर निघालेले असे अनेक वृद्ध आणि आजारी रानगवे मेळघाटातील दूरवरच्या जगाल परिसरातून आमच्या जारीदा वन परिक्षेत्रात राहायला येतात. ते अनेकदा एकटेच भटकतात, असं जंगलात सातत्यानं अनेक प्राण्याचं निरीक्षण करताना वनरक्षक, वनपाल, वनमजूरांना लक्षात आलं. रानगव्यांचा निरिक्षणातून केलेल्या अभ्यासातून हे जंगलाचा हा भाग रानगगव्यांनी खास एकांतवासाठी निवडला असावा, असं सुशांत काळे यांनी सांगितलं.

तिघांचा नैसर्गिक मृत्यू : मेळघाटातील प्रमुख पाच नद्यांपैकी एक असणारी खंडू नदी जारीदा वनपरिक्षेत्रातून वाहते. घनदाट जंगल असणाऱ्या या भागात काही रानगवे आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ एकांतवासात घालवतात. या जंगल परिसरात तीन वाघ, तीस ते चाळीस बिबटे आणि सर्वाधिक संख्येत असणारी अस्वल यांच्यासह सांबर, हरिण, नीलगाय मोठ्या संख्येत आहेत. अनेकदा इतर मांसभक्षी प्राण्यांप्रमाणं वाघ रानगव्यांची शिकार करू शकतात. मात्र, वजनदार रानगव्यांपासून ते थोडे बचावून असतात. त्यामुळं या जंगलात वृद्ध रानगवे स्वतःला सुरक्षित मानतात. या जंगल परिसरात तीन वर्षात एकूण तीन रानगव्यांचं निधन हे नैसर्गिकरित्या झालं असल्याचं लक्षात आलंय, अशी माहितीदेखील सुशांत काळे यांनी दिली.

पाणवठ्यांवर दिसतो रानगवा : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी जारीदा वनपरिक्षेत्रात सौरऊर्जेच्या मदतीनं सहा पाणवठे तयार करण्यात आलेत. या पाणवठ्यावर नीलगाय, सांबर आणि अस्वल येतात. जंगलातील या पाणवठ्यावर रानगवा हा एकटाच येतो. या जंगलात पाण्याची व्यवस्था आणि भरपूर गवत आहे. पहाटे आणि सायंकाळी रानगवा पाणवठ्यांवर पाणी प्यायला आला की अनेकदा दिसतो, असं सुशांत काळे यांनी सांगितलं.

एकांतवासात जगतो केवळ नर : वयोवृद्ध झाल्यावर रानगवाच नव्हे तर अनेक वन्यप्राणी हे एकांतवासात जगतात. विशेष म्हणजे समूहात राहणाऱ्या वन्यप्राण्यांमध्ये केवळ नर प्राणीच वृद्धावस्थेत समूहापासून दूर एकांतवासात जगतात. यामध्ये रानगव्यासोबतच हत्ती, सिंह आणि वाघ असे अनेक प्राणी आहेत, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक प्रदीप हिरुळकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. हा निसर्गनियम आहे. कळप सांभाळण्याची, शत्रूशी लढण्याची क्षमता संपते. त्यावेळी हे प्राणी कळपातून बाजूला होऊन एकांतवासात जगतात, असंदेखील प्रदीप हीरुळकर यांनी सांगितलं.

हेही वाचा-