नाशिक : मागील काही दिवसांपासून राज्यात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर पद्धतीनं राहत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकरणी नाशिकमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. हा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक माळी यांना मिळालेल्या माहितीनुसार, "शहरातील आडगाव परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी काही बांगलादेशी बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं चार दिवस सुपरवायझर, मजूर यांचं वेषांतर करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करत माहिती गोळा केली. यानंतर पोलिसांनी आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली." याबाबतची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.
बांगलादेशी असल्याचे मिळाले पुरावे : "नाशिकच्या आडगाव परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी काही बांगलादेशी मजूर वास्तव्य करत असल्याची माहिती आमच्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी बांधकाम सुपरवायझर, मजूर यांचं वेषांतर करून बांधकामाच्या ठिकाणी काम करत माहिती गोळा केली. यात आम्ही आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यांच्यातील काही जणांकडं बांगलादेशी नागरिक असल्याचं ओळखपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला सापडला आहे," असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं.
'यांना' केली अटक : या सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे शाखेच्या पथकानं सुमन कालाम गाझी (27), अब्दुल अलीम मंडल (30), शाहीन मफिजुल मंडल (23), आलीम सुआनखान मंडल (32), अलअमीन आमीनुर शेख (22), मोसीन मौफीजुल मुल्ला (22), लासेल नुरअली शंतर (23) आणि आसाद अर्थदअली मुल्ला (30) या आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
- कोडीनयुक्त कफसिरपच्या १७६४० बाटल्या जप्त; विनापरवाना गुंगीचे औषध विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक
- धरणांच्या तालुक्यातील उताणी घागर भरण्यासाठी १२ कोटी ६६ लाखांची मंजुरी; तर, भावली धरणाच्या पाण्याची प्रतीक्षाच
- अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; जिल्हाधिकारी पण दोषी, किरीट सोमैयांची पोलिसांत तक्रार