मुंबई : "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आहे, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. दोन ठाकरे एकत्र आले तर त्यावर काय भावना आहेत, हे आम्ही समजून घेत आहोत," अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. राज ठाकरे यांनी दिलेली साद व त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यावर राऊत बोलत होते.
भाजपावर हल्लाबोल : "आमच्यात कोणतेही वाद व भांडण नाही, असले तरी मिटवायला वेळ लागत नाही. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौजा आहेत, असे उद्धव ठाकरे लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी सांगत होते. त्यांच्यासोबत आपण कोणताही संबंध ठेवता नये. भाजपासोबत 25 वर्षे आमची युती होती त्यापैकी काही काळ राज ठाकरे सोबत होते. महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आम्ही बाजूला झालो. महाराष्ट्राच्या शत्रुला फायदा होईल, अशी भूमिका घेऊ नये, असे आमचे म्हणणे होते. महाराष्ट्राला पाण्यात पाहणाऱ्या काही शक्ती आजही आहेत, महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान व्हावे, यासाठी काहीजण पडद्यामागून काम करत आहेत, त्यांच्या पंक्तीला आम्ही एकत्र बसणार नाहीत, घरात घेणार नाही, अशी भूमिका सर्वांनी घेण्याची गरज आहे," असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. या भूमिकेचा पुरस्कार राज ठाकरेंनी करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
#WATCH | Mumbai | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, " raj thackeray has said that if there are any grudges between the two brothers, then i will keep my ego aside and will remove it (grudges) for the best interests of maharashtra. on which uddhav thackeray has said that we are… pic.twitter.com/39cKOyEOSa
— ANI (@ANI) April 19, 2025
आम्ही सकारात्मक भूमिकेतून पाहतो : "भाजपा व त्यांचे बगलबच्चे हे राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना ठाकरे हे नाव नष्ट करायचे आहे, अशा वेळी दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साद व प्रतिसाद अशी भूमिका घेतली आहे, त्याचे महाराष्ट्र स्वागत करत आहे. आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सर्व बाबींकडे पाहत आहोत. आम्ही 'वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत आहोत. संयुक्त महाराष्ट्र लढ्यावेळी तेव्हाच्या विविध विचारसरणींच्या नेत्यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही त्याच प्रवाहातील कार्यकर्ते आहोत," असं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे यांनी त्यांची 'मन की बात' केली आहे, असे राऊत म्हणाले.
भाजपा हा महाराष्ट्राचा शत्रू : "महाविकास आघाडी ही आमची राजकीय व्यवस्था आहे, राज ठाकरे सध्या भाजपा, एसंशि यांच्यासोबत आहेत. ते राज ठाकरेंचा वापर करुन या राज्यात मराठी माणसांना पडद्यामागून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, हे राज ठाकरेंच्या लक्षात आले तर मराठी माणसांवर उपकार होतील. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे बंधू आहेत. महाराष्ट्र, मराठी माणसावर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. राज ठाकरेंकडून आलेल्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. आम्ही सर्व ठाकरे एक आहोत. महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात घेतले हा आमच्यासाठी दुःखाचा व मतभेदाचा विषय राहिला, बाकी आमचा काही विरोध नाही," असे राऊत म्हणाले. आजचा भाजपा हा महाराष्ट्राचा शत्रू असल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा -