ठाणे : ठाणे जिल्ह्यात अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा गंभीर आहे. कडक कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतरही अत्याचार आणि छळाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी ठाणे पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. मात्र पालकांनीही सतर्क होणं आवश्यक आहे. त्याच प्रमाणं सेवाभावी सामाजिक संघटनेच्या सहभागानं जनजागृती करून यावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल. यासाठी पोलिसांसोबत काम करताना सामाजिक संघटनांना विशेष अधिकार दिल्यानं प्रक्रिया गतिमान होईल. त्यामुळे वाढत्या घटनांना आळा घालण्यात यश मिळेल, अशी आशा मदत संस्थेच्या संचालिका शशी अग्रवाल यांनी व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्यात 2 हजार बालकांवर अत्याचार : ठाणे जिल्ह्यात 2 हजार 027 बालक अन्याय, अत्याचारानं पीडित आहेत. ही गंभीर बाब आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अन्याय आणि अत्याचारात बळी गेलेल्या बालकांची संख्या 15 एवढी आहे. तर इतर अन्याय आणि अत्याचार झाल्याच्या गंभीर घटनांची संख्या ही धक्कादायक आहे. तब्बल 360 घटना समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, अपहरणासह इतर गंभीर घटना मिळून जिल्ह्यात तब्बल दोन हजार 27 बालकांवर अन्याय, अत्याचार झाल्याच्या गंभीर घटना प्रकाश झोतात आल्या आहेत. खडवलीतील बेकायदा वसतिगृहात 29 बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना प्रशासनाच्या सतर्कतेनं दोन दिवसांपूर्वी उघड झाली आहे. गेल्या वर्षात दोन हजार 27 बालकांवर अत्याचार झाल्याचे गुन्हे देखील नोंदवण्यात आलेले आहेत.
वसतिगृहातील वास्तव : वसतिगृहात राहणाऱ्या बालकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या प्रकारांमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. बालकांना शिक्षण आणि जीवनाला एक चांगली लागणारी शिस्त यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील मुले वसतिगृहाच्या आश्रयानं राहतात. त्यामुळेच एकट्या बालकावर अत्याचार होत असल्यानं बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील बालकांवरील अन्याय अत्याचाराच्या गंभीर घटना गेल्या वर्षी घडल्या आहेत. त्यात विविध घटनांमधील बालकांचे वेगवेगळ्या कारणांनी खून झाल्याचं प्रकाश झोतात आलं आहे. तर 36 बालकांवर अत्याचार झाल्याचंही समोर आलं.
अत्याचारानंतर, अपहरण होण्याचा ससेमिरा : बालकांवरील अन्याय अत्याचार या व्यतिरिक्त बालकांचं अपहरण आणि पळवून नेण्याच्या घटनांचा विक्रमच म्हणावा लागेल. "1 हजार 526 बालकांचं अपहरण आणि पळवून नेल्याच्या नोंदी आहेत. त्यात दोन बालकांना सोडून देण्यात आलं, तर प्रत्यक्षात 225 बालकांना गंभीर घटनांना तोंड द्यावं लागल्याची बाब निदर्शनास आली आहे," अशी माहिती पोलीस अधिकारी चेतना चौधरी यांनी दिली.
सामाजिक संस्था सोबत घेऊन अत्याचार कमी करता येऊ शकतात : "सध्याच्या परिस्थितीत पोलिसांपुढं अल्पवयीन मुली, मुलांवरील अन्याय आणि अत्याचार, असुरक्षित महिलांवरील अत्याचार या सोबतच बालकांवरील अत्याचाराचं आव्हान आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी पोलिसांसोबत काम करणाऱ्या सामाजिक संघटना, संस्था यांना सोबत घेऊन त्यांना विशेष अधिकार देत अन्याय, अत्याचार विरोधात सक्षमपणे लढता येऊ शकते. निश्चितच या घटनांना पायबंद बसेल," अशी माहिती मदत संस्थेच्या संचालिका शशी अग्रवाल यांनी दिली.
हेही वाचा :
- शाळेतील मुख्याध्यापकाच्या कृत्यानं नांदेड हादरलं; गुंगीचं औषध देऊन केला अत्याचार, मग धमकी देत केला गर्भपात
- तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 50 वर्षीय नराधमाच्या आवळल्या मुसक्या
- मुंबईकर पुन्हा हादरले : शाळेत जाणाऱ्या बालिकेवर रिक्षा चालकाचा अत्याचार, चेंबूरमधील खळबळजनक घटना - Minor Girl Abused In Mumbai